फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic index) जास्त असल्याने काही फळं साठीनंतर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. केळी, द्राक्षं, आंबा, अननस आणि टरबूज यांसारखी फळं ज्येष्ठांच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात आणि ती किती प्रमाणात खावीत, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
फळं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. हे खरंही आहे, पण एका विशिष्ट वयानंतर काही गोड फळं फायद्याऐवजी नुकसान करू लागतात. हो! वयाच्या साठीनंतर ज्येष्ठांनी काही फळं खाणं टाळायला हवं. या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि त्यातील साखरेचं प्रमाण याला कारणीभूत आहे. चला तर मग जाणून घेऊया, कोणती फळं तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात आणि कोणती फळं तुम्ही दीर्घायुष्यासाठी खाऊ शकता.
केळ्यांमध्ये साखर आणि कार्ब्स जास्त
केळं ऊर्जेचा एक उत्तम स्रोत आहे, पण त्यातील जास्त साखर आणि कार्ब्स वाढत्या वयात त्रासदायक ठरू शकतात. केळं खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढू शकते. जर तुम्हाला मधुमेह असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केळी खाऊ नका.
गोड द्राक्षांपासून दूर राहा
द्राक्षं चवीला खूप गोड असतात आणि त्यात नैसर्गिक साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. साठीनंतर तुम्ही द्राक्षं खाणं कमी करा, जेणेकरून रक्तातील साखर नियंत्रणात राहील. तरीही खाण्याची इच्छा झाल्यास, आठवड्यातून १-२ वेळा थोड्या प्रमाणात खाऊ शकता.
आंबा जास्त प्रमाणात खाऊ नका
उन्हाळा आला की बाजारात आंब्याची रेलचेल असते. आंबा तुमचं आवडतं फळ असलं तरी, वाढत्या वयात तुम्ही तो खूप कमी प्रमाणात खायला हवा. आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन दिवस आंबा खाऊ शकता.
अननसामुळे ॲसिडिटी वाढू शकते
ज्येष्ठांनी टाळावीत अशा फळांमध्ये अननसाचाही समावेश आहे. अननस खाल्ल्याने ॲसिडिटी आणि साखर या दोन्ही समस्या वाढू शकतात. जर तुम्हाला सतत गॅसचा त्रास होत असेल, तर तुम्ही अननस खाणं टाळलंच पाहिजे. खायचंच असेल, तर खूप कमी प्रमाणात खा आणि रिकाम्या पोटी तर अजिबात खाऊ नका.
टरबुजाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो
टरबूज शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी चांगलं फळ मानलं जातं आणि उन्हाळ्यात ते खूप खाल्लं जातं. पण जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तर टरबुजाचं सेवन कमी प्रमाणात करा, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो.


