पंजाब किंग्सच्या आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर, भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग आणि प्रियांश आर्य यांच्या फोटोवर एक मजेशीर कमेंट केली आहे. युवराजने "तुम्हा सगळ्यांना चपलेने मारण्याची वेळ आली आहे," असे म्हटले.
IPL 2026 च्या हंगामात पंजाब किंग्स पुन्हा एकदा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याची एक सोशल मीडिया कमेंट सध्या जोरदार चर्चेत आली आहे. पंजाबच्या काही खेळाडूंवर युवराजने मजेशीर पण टोलेबाज शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.

कोण आहेत हे खेळाडू
ही चर्चा सुरू झाली हरप्रीत ब्रार याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे. या फोटोमध्ये प्रियांश आर्य, अर्शदिप सिंग आणि हरप्रीत ब्रार एकत्र दिसत होते. फोटोला दिलेल्या मजेशीर कॅप्शननंतर युवराज सिंगने कमेंट करत, “आता तुम्हा सगळ्यांना चपलेने मारण्याची वेळ आली आहे,” असे लिहिले. त्याची ही कमेंट काही वेळातच व्हायरल झाली.
रागाच्या भरात दिली प्रतिक्रिया
विशेष म्हणजे युवराज सिंगचा प्रियांश आर्याशी जवळचा संबंध मानला जातो. प्रियांशने अनेकदा युवराजकडून मार्गदर्शन घेतल्याचं बोललं जातं. त्यामुळे युवराजची ही प्रतिक्रिया रागापेक्षा मित्रत्वाच्या शैलीत केली गेली असावी, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. पंजाब किंग्सचा संघ यंदाही अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. संघातील काही खेळाडूंनी वैयक्तिक पातळीवर चांगली कामगिरी केली असली, तरी संघाला सातत्य राखण्यात अपयश आलं. त्यामुळे पंजाबचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग पुन्हा अडला.
दरम्यान, अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवरही प्रश्न उपस्थित झाले होते. काही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक ठरली. त्यामुळे पंजाबच्या चाहत्यांकडूनही संघ व्यवस्थापनावर आणि खेळाडूंवर टीका होताना दिसली. युवराज सिंगची ही कमेंट मजेत केली असली तरी सोशल मीडियावर ती प्रचंड चर्चेत आली आहे. अनेक चाहत्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी पंजाब किंग्सच्या सातत्याने होणाऱ्या अपयशावर नाराजी व्यक्त केली. IPL संपत आलं असतानाच या व्हायरल कमेंटने क्रिकेटविश्वात वेगळीच रंगत आणली आहे.


