विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पुन्हा एकदा वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचले. तिथे त्यांनी महाराजांचं प्रवचन ऐकून आशीर्वाद घेतला. गेल्या ५ महिन्यांतील त्यांची ही तिसरी भेट असून, या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Virat-Anushka Meet Premanand Maharaj: IPL 2026 च्या धावपळीतून वेळ काढून विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत पुन्हा एकदा वृंदावनला पोहोचला आहे. २० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या दोघांनी प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. विशेष म्हणजे, गेल्या ५ महिन्यांत विराट आणि अनुष्का तिसऱ्यांदा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचले आहेत. विराट-अनुष्काचा अध्यात्माकडे असलेला ओढा सर्वांनाच माहीत आहे. हे जोडपं अनेकदा मंदिरात किंवा संतांच्या सत्संगामध्ये दिसतं.
आश्रमात भक्तिभावाने बसलेले दिसले विराट-अनुष्का
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात विराट आणि अनुष्का इतर भाविकांसोबत बसून प्रेमानंद महाराजांचं प्रवचन ऐकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ श्री हित राधा केली कुंज येथील आहे. यात दोघेही पूर्ण श्रद्धेने आध्यात्मिक चर्चेत सहभागी होऊन आशीर्वाद घेताना दिसत आहेत. विराट-अनुष्काचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून, त्यांच्या या साधेपणाचं आणि आध्यात्मिक वृत्तीचं चाहते कौतुक करत आहेत.
कोण आहेत प्रेमानंद महाराज?
प्रेमानंद महाराज हे आजच्या काळातील एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांचं मूळ नाव प्रेमानंद गोविंद शरण आहे. ते विशेषतः त्यांची भक्ती, साधेपणा आणि आत्म-शिस्तीवर आधारित शिकवणीसाठी ओळखले जातात. महाराज राधा वल्लभ संप्रदायाचे अनुयायी आहेत. त्यांची शिकवण श्रद्धा, संतुलित जीवन आणि आंतरिक शांती यावर केंद्रित आहे, ज्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.
सुरुवातीचं आयुष्य आणि संन्यास
प्रेमानंद महाराजांचा जन्म ३० मार्च १९७१ रोजी उत्तर प्रदेशमध्ये अनिरुद्ध कुमार पांडे या नावाने झाला. लहानपणापासूनच त्यांचा कल अध्यात्माकडे होता. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्यांनी घरदार सोडून संन्यास घेतला आणि आध्यात्मिक साधनेला सुरुवात केली. त्यांनी आयुष्याचा मोठा काळ वाराणसीमध्ये गंगेच्या काठी घालवला. तिथे त्यांनी ध्यान, साधना आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान मिळवलं, ज्यामुळे त्यांची आध्यात्मिक दृष्टी अधिक खोल झाली.
दीक्षा आणि आध्यात्मिक नाव
राधा वल्लभ संप्रदायात दीक्षा घेतल्यानंतर त्यांना 'आनंदस्वरूप ब्रह्मचारी' हे नाव मिळालं. पुढे 'स्वामी अखंडानंद आश्रम' आणि नंतर 'प्रेमानंद गोविंद शरण' या नावाने त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांचे गुरू गौरंगी शरण यांनी त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली.


