वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताच्या संधींबद्दल राहुल द्रविडने आपलं मत मांडलं आहे. पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया मागे असली तरी, संघाची गुणवत्ता पाहता त्यांना कमी लेखता येणार नाही, असं द्रविड म्हणाला.
डब्लिन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत टीम इंडिया सध्या थोडी मागे असली तरी, संघाची गुणवत्ता पाहता त्यांना अजिबात कमी लेखता येणार नाही, असं भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला आहे. WTC पॉइंट्स टेबलमध्ये भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी संघासमोर मोठं आव्हान आहे. फायनलची संधी टिकवून ठेवण्यासाठी भारताला उरलेले बहुतेक सामने जिंकावे लागतील.
तरीही, द्रविडने टीम इंडियाच्या आशा सोडलेल्या नाहीत. तो म्हणाला, ''मला आशा आहे की ते फायनलसाठी पात्र ठरतील. जर भारत WTC फायनलमध्ये पोहोचला, तर ते एक मोठं यश असेल. भारत थोडा मागे नक्कीच आहे, पण भारतीय संघाची गुणवत्ता पाहता तुम्ही त्यांना कधीही स्पर्धेतून बाहेर समजू शकत नाही. श्रीलंकेविरुद्ध त्यांनी चांगली सुरुवात केली आहे, ही एक चांगली पहिली पायरी आहे. न्यूझीलंडमध्ये जाऊन खेळणं हे नेहमीच एक मोठं आव्हान असतं. आपल्या घरच्या मैदानावर न्यूझीलंड हा सर्वात कठीण संघ आहे. अनेक तरुण भारतीय खेळाडू त्या परिस्थितीत खेळलेले नाहीत, त्यामुळे ते एक मोठं आव्हान असेल.''
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-0 ने पुढे आहे. दुसऱ्या कसोटीतही दमदार फलंदाजी करून भारताने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. ही मालिका जिंकल्यास भारताला महत्त्वाचे पॉइंट्स आणि आत्मविश्वास मिळेल, पण पुढचा मार्ग खूपच खडतर आहे. ऑक्टोबरमध्ये होणारा न्यूझीलंड दौरा हे WTC च्या शर्यतीत भारतासमोरील पुढचं मोठं आव्हान असेल. या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या निवृत्तीमुळे भारताने गमावलेल्या अनुभवावरही द्रविडने बोट ठेवलं. मागच्या वेळी जेव्हा भारत न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता, तेव्हा हे अनुभवी खेळाडू संघात होते. पण आता त्यांच्या अनुपस्थितीत तरुण खेळाडूंना या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. द्रविड म्हणाला, ''येत्या काही महिन्यांत खेळाडूंना फिट ठेवणं आणि दुखापती टाळणं महत्त्वाचं आहे. मागच्या दौऱ्यावेळी संघात असलेले विराट, रोहित, रहाणे आणि पुजारा यांचा अनुभव आता आपल्याकडे नाही.''
न्यूझीलंड दौऱ्यानंतर, जानेवारी 2027 मध्ये होणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही भारतासाठी आणखी एक मोठी कसोटी असेल. या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार आहे. भारतात कसोटी मालिका जिंकण्याचं ऑस्ट्रेलियन संघाचं मोठं स्वप्न आहे, त्यामुळे ते अधिक जोशात येतील, अशी अपेक्षा द्रविडने व्यक्त केली.


