- Home
- Mumbai
- विरार-डहाणूकरांचा प्रवास आता 'सुपरफास्ट'! पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्यांची लोकल; १७ नवीन फेऱ्यांमुळे गर्दीतून सुटका!
विरार-डहाणूकरांचा प्रवास आता 'सुपरफास्ट'! पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्यांची लोकल; १७ नवीन फेऱ्यांमुळे गर्दीतून सुटका!
Mumbai Local: पश्चिम रेल्वेने विरार-डहाणू मार्गावर १५ डब्यांच्या लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. या नवीन सेवेमुळे रेल्वेची प्रवासी क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार असून, १७ फेऱ्या सुरू करण्यात येणारय.

विरार-डहाणूकरांचा प्रवास आता 'सुपरफास्ट'! पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्यांची लोकल
मुंबई: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी, विशेषतः विरार आणि डहाणू पट्ट्यातील लोकांसाठी एक सुखद धक्का समोर आला आहे. रोजच्या प्रवासातील जीवघेणी गर्दी आता कमी होणार असून, रेल्वेने या मार्गावर १५ डब्यांची लोकल चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नुकतीच या लोकलची यशस्वी 'ट्रायल रन' पूर्ण झाली असून, लवकरच या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
१२ डब्यांचे टेंशन संपले; आता १५ डब्यांचा थाट!
चर्चगेट ते विरार आणि विरार ते डहाणू या मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या मार्गांवर आता रेल्वेने आपली क्षमता वाढवली आहे. चेन्नईच्या आयसीएफ (ICF) कारखान्यातून खास १५ डब्यांच्या लोकल मुंबईत दाखल झाल्या आहेत. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनानुसार, सध्याच्या १२ डब्यांच्या गाड्या आता १५ डब्यांमध्ये रूपांतरित केल्या जातील, ज्यामुळे एकाच वेळी हजारो प्रवाशांना अतिरिक्त जागा उपलब्ध होईल.
असे असेल फेऱ्यांचे गणित
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन एकूण १७ नवीन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
चर्चगेट ते विरार: १५ डब्यांच्या ९ लोकल फेऱ्या.
विरार ते डहाणू: १५ डब्यांच्या ८ लोकल फेऱ्या.
या निर्णयामुळे विशेषतः ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक सुसह्य होईल.
पायाभूत सुविधा सज्ज!
१५ डब्यांची गाडी म्हटली की फलाटांची लांबी महत्त्वाची ठरते. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) विरार-डहाणू मार्गावरील स्थानकांच्या फलाटांची लांबी आणि रुंदी वाढवण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे. रविवार, ५ एप्रिल रोजी या मार्गावर घेतलेली चाचणी यशस्वी झाल्याने आता केवळ हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांचे मत
"विरार-डहाणू मार्गावर पहिल्यांदाच १५ डब्यांची सेवा सुरू होत आहे. यामुळे रेल्वेची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २५ टक्क्यांनी वाढेल आणि पीक अवर्समधील गर्दीचे नियोजन करणे सोपे जाईल."

