Thackeray Brothers : राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर ठाकरे गट आणि मनसेमध्ये तणाव वाढल्याच्या चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या कोट्यातील तीन स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित केली असून मनसेला संधी न मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Thackeray Brothers : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातमिळवणी केलेल्या ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा मतभेद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी स्वीकृत नगरसेवकांबाबत घेतलेला निर्णय हा देखील राजकीय संकेत मानला जात आहे.

शिंदे-राज भेटीवरून वादाची ठिणगी

महानगरपालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. निवडणुकीआधी शिंदेंवर टीका करणारे राज ठाकरे आता शहरातील प्रश्नांसाठी त्यांच्याकडे गेले, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील काही नेत्यांनी आक्षेप घेतल्याचे समजते. मात्र राज ठाकरे यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर देत ही भेट केवळ नागरी प्रश्नांसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे.

स्वीकृत नगरसेवकांवरून तणाव वाढला

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक म्हणून तीन नावांवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांची नावे निश्चित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.मनसेकडून त्यांच्या कोट्यातील एक स्वीकृत नगरसेवकपद देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या निर्णयामुळे मनसेला संधी न मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 28 फेब्रुवारीला अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आहे.

दोन्ही पक्षांच्या नेत्यांची सावध भूमिका

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सूचक वक्तव्य केले. तर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या विषयावर उतावळेपणाने भाष्य न करण्याची भूमिका घेतली.मनसे गटनेते यशवंत किल्लेदार यांनीही अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील, असे स्पष्ट केले आहे.

राजकीय समीकरणांवर परिणाम?

महानगरपालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच भेट होती. या भेटीनंतर ठाकरे बंधूंमधील संबंधांबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. आगामी निर्णयांमुळे मुंबईतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.