Shivsena Vardhapan Din : उबाठा गटातील सहा खासदारांच्या अनुपस्थितीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याची चर्चा रंगत असतानाच शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शिंदे आणि ठाकरे गट स्वतंत्र मेळावे घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षप्रमुखांच्या भाषणांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Shivsena Vardhapan Din : महाराष्ट्राच्या राजकरणात गेल्या काही दिवसांपासून मोठी उलथापालथ होत आहे. तब्बल चार वर्षांनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नुकत्याच दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक उबाठाने बोलावली होती. यावेळी सहा खासदार अनुपस्थितीत राहिले. यामुळे या खासदारांनी बंड केल्याच्या चर्चांनी जोर पकडलाय. खरंतर, बैठकीपूर्वी सर्वांसाठी व्हीप बजावण्यात आला तरीही सहा खासदार आलेच नाहीत. अशातच हेच सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे ऑपरेश टायगर यशस्वी झाल्याची स्थितीही दुसऱ्या बाजूला निर्माण झाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांचे शक्तिप्रदर्शन

या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर १९ जून रोजी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी दोन्ही गटांकडून स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे केवळ वर्धापन दिनाच्या दिवशी राजकीय शक्तिप्रदर्शनाची चुरसही पाहायला मिळणार आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने या मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

नेस्को सेंटरमध्ये शिंदे गटाचा भव्य मेळावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई, ठाणे आणि राज्यातील विविध भागांत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 'ऑपरेशन टायगर'नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या मेळाव्यात शिंदे नेमकी कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाची सभा

दुसरीकडे, उबाठा गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सायन येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पक्षातील घडामोडींनंतर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय संदेश देतात, बंडखोरीच्या चर्चांवर ते कशी प्रतिक्रिया व्यक्त करतात, याची उत्सुकता वाढली आहे. या सभेलाही मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

ठाकरे-शिंदे काय बोलणार?

पक्षातील संभाव्य फुटीनंतर दोन्ही गटांच्या व्यासपीठांवरून कोणते राजकीय संदेश दिले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बंडखोरी, आगामी राजकीय रणनीती आणि पक्षाच्या भविष्यासंदर्भात दोन्ही पक्षप्रमुख काय भूमिका मांडतात, यावर राज्याच्या राजकीय समीकरणांचा पुढील मार्ग ठरण्याची शक्यता आहे.