- Home
- Mumbai
- धक्काधक्कीच्या प्रवासातून कायमची सुटका? पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक मास्टरप्लॅन; 'या' तारखेपासून वाढणार १५ डब्यांच्या फेऱ्या!
धक्काधक्कीच्या प्रवासातून कायमची सुटका? पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक मास्टरप्लॅन; 'या' तारखेपासून वाढणार १५ डब्यांच्या फेऱ्या!
Mumbai 15 coach local trains: पश्चिम रेल्वेने मुंबईकरांना दिलासा देत १९ मार्चपासून १२ डब्यांच्या १६ उपनगरीय फेऱ्यांचे १५ डब्यांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रवासी क्षमता २५% वाढणार असून ८ अतिरिक्त फेऱ्यांचा फायदा प्रवाशांना मिळेल.

मुंबईकरांना मोठा दिलासा!
मुंबई: पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकल मधील 'तुडुंब' गर्दीतून सुटका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून म्हणजेच १९ मार्च पासून पश्चिम रेल्वेवर १२ डब्यांच्या गाड्यांऐवजी १५ डब्यांच्या लोकल धावणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार असून प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
उद्यापासून नेमका काय बदल होणार?
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून १२ डब्यांच्या १६ उपनगरीय फेऱ्यांचे रुपांतर १५ डब्यांमध्ये केले जाणार आहे. चेन्नई येथील 'इंटिग्रल कोच फॅक्टरी'मध्ये तयार करण्यात आलेल्या या अत्याधुनिक कोचची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता त्या प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहेत.
गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठी लॉटरी!
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवांच्या नियोजनात खालील महत्त्वाचे बदल होतील:
एकूण फेऱ्या: १५ डब्यांच्या सेवांची संख्या आता २११ वरून २२७ वर पोहोचेल.
पीक अवर फायदा: वाढवलेल्या १६ फेऱ्यांपैकी ८ फेऱ्या ऐन गर्दीच्या वेळी चालवल्या जातील.
सकाळ-संध्याकाळ: यात सकाळच्या ४ आणि संध्याकाळच्या ४ विशेष फेऱ्यांचा समावेश आहे, ज्यामुळे कामावर जाणाऱ्या-येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
विरार-अंधेरीनंतर आता वांद्रेपर्यंत विस्तार!
पश्चिम रेल्वे केवळ १५ डबे वाढवून थांबलेली नाही, तर या सेवांचा विस्तार आता वांद्रे स्थानकापर्यंत करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.
प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे: विलेपार्ले, सांताक्रूझ, खार रोड आणि वांद्रे या स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
फायदा: हे काम पूर्ण होताच विरारहून सुटणाऱ्या १५ डब्यांच्या लोकल थेट वांद्रेपर्यंत धावू शकतील.
जास्तीचे ३ डबे म्हणजे प्रत्येक फेरीत किमान २५% अधिक प्रवासी सामावून घेण्याची क्षमता!

