- Home
- Mumbai
- Mumbai Metro 8 : मुंबई–नवी मुंबई विमानतळ फक्त 30 मिनिटांत! दोन एअरपोर्टला जोडणारी मेट्रो कधी धावणार?
Mumbai Metro 8 : मुंबई–नवी मुंबई विमानतळ फक्त 30 मिनिटांत! दोन एअरपोर्टला जोडणारी मेट्रो कधी धावणार?
Mumbai Metro Line 8 Project : मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो-8 लाईनला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली. हा प्रकल्प दोन्ही विमानतळांमधील प्रवासाचा वेळ २ तासांवरून ३० मिनिटांवर आणेल.

मुंबई–नवी मुंबई विमानतळ जोडणारी मेट्रो-8 कधी सुरू होणार?
मुंबई : मुंबईत लोकलनंतर ज्या वाहतूक सुविधेने शहराची गती वाढवली ती म्हणजे मेट्रो. वाढत्या वाहनतळामुळे होणारी कोंडी कमी करण्यासाठी मेट्रोचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली मेट्रो लाईन 8 आता हळूहळू वास्तवाच्या दिशेने वेग घेत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने या मार्गिकेला हिरवा कंदील दिल्याने प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे.
दोन विमानतळांना जोडणारा पहिलाच जलद मार्ग
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) यांना थेट जोडणारी ही पहिलीच मेट्रो लाईन असणार आहे. सध्या या प्रवासाला साधारण 2 तासांचा कालावधी लागतो, पण मेट्रो 8 सुरू झाली की हे अंतर फक्त 30 मिनिटांत पार करता येणार आहे.
23,000 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
राज्य सरकारने सुमारे 23,000 कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आधीच मंजुरी दिली आहे. काम सुरू असून ही मार्गिका मुंबई–नवी मुंबई कनेक्टिव्हिटीला एक नवा आयाम देणार आहे.
NMIA लवकरच सुरू, प्रवासाची मोठी सोय
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डिसेंबरपासून उड्डाणे सुरू होणार आहेत. मात्र सध्या येथे पुरेशी वाहतूक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे मेट्रो 8 हा प्रकल्प प्रवाशांसाठी भविष्यातील अत्यंत महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे.
अंदाजे 20 स्थानके, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नेटवर्क
मुंबई ते नवी मुंबईदरम्यान प्रस्तावित या मेट्रो कॉरिडॉरमध्ये सुमारे 20 स्थानके असतील असा अंदाज आहे. ही मार्गिका दोन्ही शहरांतील प्रमुख विमानतळांना जोडल्याने व्यावसायिक प्रवास, तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्रातील संपर्क, तसेच दररोजच्या प्रवाशांची सोय मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
नवी मुंबईच्या पुढील विकासासाठी ही लाईन निर्णायक भूमिका बजावणार
मेट्रो 8मुळे लोकलसोबत प्रवासाचा एक मजबूत पर्याय उपलब्ध होईल. शिवाय नवी मुंबईच्या पुढील विकासासाठी ही लाईन निर्णायक भूमिका बजावेल, असे तज्ञांचे मत आहे.

