Mumbai Local : कर्जत–पनवेल 29 किमी उपनगरी रेल्वे प्रकल्प अंतिम टप्प्यात असून वर्षाअखेरीस सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. पनवेल स्थानक प्रमुख इंटरचेंज ठरणार असून आधुनिक सुविधा, नवीन पादचारी पूल आणि 12 डब्यांच्या गाड्यांसाठी तयारी केली जात आहे.  

Mumbai Local : सेंट्रल आणि हार्बर रेल्वे नेटवर्कला थेट जोडणारा कर्जत–पनवेल उपनगरी रेल्वे प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रवाशांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सुमारे 29 किलोमीटर लांबीचा हा जोडमार्ग वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानकांवरील आणि तांत्रिक कामांना वेग आल्याने लवकरच अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे.

29 किलोमीटरचा महत्त्वाचा जोडमार्ग

हा 29 किलोमीटर लांबीचा मार्ग मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने उभारला जात आहे. या मार्गावर कर्जत, चौक, मोहोपाडा, रसायनी आणि पनवेल अशी स्थानके असणार आहेत. प्रकल्पांतर्गत बोगदे, पूल आणि ट्रॅक टाकण्याची कामे अंतिम टप्प्यात असून सिग्नलिंग आणि इंटरलॉकिंग प्रणालीची उभारणीही पूर्णत्वाकडे आहे. तांत्रिक चाचणीनंतर सेवा सुरू करण्याची तयारी केली जात आहे.

पनवेल ठरणार प्रमुख इंटरचेंज

कर्जत लोकल सुरू झाल्यानंतर पनवेल स्थानक सेंट्रल आणि हार्बर मार्गांना जोडणारे महत्त्वाचे इंटरचेंज ठरणार आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून स्थानकावर विस्तारकामे हाती घेण्यात आली आहेत. भविष्यातील 12 डब्यांच्या लोकल गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जात आहे. तसेच प्लॅटफॉर्मची उंची सुधारून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे.

नवीन पादचारी पूल आणि आधुनिक सुविधा

पनवेल स्थानकावर नवीन पादचारी पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. हा पूल विविध प्लॅटफॉर्मना जोडणार असून गर्दीचे व्यवस्थापन अधिक सुलभ करेल. पुलावर लिफ्ट आणि एस्कलेटरची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्यातील प्रवासी वाढ लक्षात घेऊन आधुनिक सुविधा विकसित केल्या जात आहेत.

नवी मुंबई विमानतळामुळे वाढले महत्त्व

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर या जोडमार्गाचे रणनीतिक महत्त्व अधिक वाढले आहे. कर्जत आणि परिसराला नवी मुंबईशी थेट रेल्वे संपर्क मिळाल्यास प्रवासाचा कालावधी कमी होईल. यामुळे औद्योगिक तसेच निवासी विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, हा प्रकल्प उपनगरी प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.