Mumbai : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीकडून वितरित करण्यात आलेल्या ८०० कोटी रुपयांच्या विकासनिधीवरून वाद निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांना मोठा निधी मिळाल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी भाजपवर टीका केली आहे. काँग्रेसनेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

Mumbai : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने वितरित केलेल्या ८०० कोटी रुपयांच्या विकासनिधीवरून राजकीय वाद चिघळला आहे. सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला असून, विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना कमी निधी मिळाल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पाठोपाठ काँग्रेसनेही भाजपवर जोरदार टीका केली आहे.

विरोधकांना कमी निधी; काँग्रेसचा संताप

विरोधी पक्षांच्या अनेक नगरसेवकांना केवळ २५ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. “समाजवादी पक्ष, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) यांना मात्र भरघोस निधी देण्यात आला. भाजपचे या पक्षांशी काय हितसंबंध आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सत्ताधाऱ्यांना कोट्यवधींचा निधी

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या प्रभागाला २० कोटींपेक्षा अधिक निधी देण्यात आला आहे. तसेच सभागृह नेते गणेश खणकर यांनाही सुमारे २० कोटी रुपये मिळाले आहेत. प्रभाग समिती अध्यक्षांसह विविध वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांनाही मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

विरोधी नगरसेवकांची नाराजी वाढली

विरोधी पक्षांच्या गटनेत्यांना दोन कोटी रुपये मिळाले असले तरी इतर नगरसेवकांना अत्यल्प निधी मिळाल्याने नाराजी पसरली आहे. अनेक नगरसेवकांना केवळ काही लाख रुपयांवर समाधान मानावे लागले असल्याचे सांगितले जात आहे.

दुजाभावाविरोधात काँग्रेसचा इशारा

विकासनिधी वाटपात झालेल्या कथित अन्यायाविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. “असा दुजाभाव सहन केला जाणार नाही. या प्रकरणी जाब विचारल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही,” असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.