एका महिन्यापूर्वीच भारतातून हद्दपार केलेल्या एका बांगलादेशी महिलेला मुंबई पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. २७ वर्षांची नादिरा सुलताना असं या महिलेचं नाव असून, ती विनापरवाना पुन्हा भारतात घुसली होती.

मुंबई : भारतात बेकायदेशीरपणे पुन्हा प्रवेश केलेल्या एका बांगलादेशी महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. २७ वर्षांच्या नादिरा सुलताना असं या महिलेचं नाव आहे. विशेष म्हणजे, फक्त एक महिन्यापूर्वीच तिला भारतातून बांगलादेशात हद्दपार करण्यात आलं होतं. तरीही तिने पुन्हा कोणत्याही कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केला. हद्दपार केल्यानंतरही ती पुन्हा भारतात कशी पोहोचली आणि तिला कोणी मदत केली का, याचा पोलीस आता तपास करत आहेत.

दक्षिण मुंबईतील गावदेवी पोलिसांनी ही कारवाई केली. ही महिला कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गेल्या शनिवारी पोलिसांना एक टीप मिळाली होती की, गिरगाव चौपाटीजवळच्या फुटपाथवर एक संशयित बांगलादेशी महिला फिरत आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन महिलेला ताब्यात घेतलं. चौकशी केली असता, ती समाधानकारक उत्तरं देऊ शकली नाही किंवा कोणतीही वैध कागदपत्रं दाखवू शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनला आणलं. तिथे केलेल्या तपासणीत तिच्याकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही वैध कागदपत्रं नसल्याचं स्पष्ट झालं. तिला गेल्याच महिन्यात बांगलादेशात हद्दपार करण्यात आलं होतं, असंही तपासात समोर आलं. मात्र, ती बेकायदेशीर मार्गाने पुन्हा भारतात घुसून मुंबईत पोहोचली, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

पोलिस आता तिचा मोबाईल फोन आणि प्रवासाची कागदपत्रं तपासणार आहेत. या प्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिची अधिक चौकशी सुरू आहे.