Heavy Rain in Thane school Closed : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजला उद्या ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 

ठाणे : मुंबईसह ठाणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढलं आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने उद्या ७ जुलै रोजी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. उद्या मंगळवारी, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला. ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज, अंगणवाड्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी हे आदेश दिले आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ठाणे जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला उद्या सुट्टी

गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. शेकडो झाडं उन्मळून पडली आहेत. या घटनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. अशात एखादी आपत्ती निर्माण होऊ शकते. या सर्व बाबी लक्षात घेता उद्या ७ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, सर्व कॉलेज यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी असे आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.

YouTube video player

रायगडमध्ये सोमवारी शाळांना सुट्टी 

आज ६ जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली होती. रायगडमध्येही गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सुरक्षिततेसाठी रायगड जिल्हा प्रशासनाने आज सोमवारी शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सततच्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याच सर्व बाबी लक्षात घेता प्रशासनाने सुट्टी जाहीर केली होती. 

नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता

दरम्यान, हवामान विभागाने मुसळधार पावसाची स्थिती ८ जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वरसह इतर भागात उद्या ७ जुलै रोजी ढगफुटी होण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सप्तश्रृंगी मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर ८ जुलैपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.