मुंबईतील नूर मोहम्मदी, शालिमार हॉस्पिटॅलिटी आणि रहमानिया रेस्टॉरंट या तीन आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने FDAने रद्द केले आहेत. अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि गंभीर त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. अमरावतीतील एका हॉटेलला व्यवसाय बंद करण्याची नोटीसही देण्यात आली आहे.

मुंबई : राज्यात 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. यानुसार मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल आणि रेस्टॉरंटचा फूड्स परवाना रद्द करण्यात आला आहे.अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी करण्यात आली. यामध्ये हॉटेल्समधील अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि गंभीर त्रुटी आढळून आल्या. या कारवाईत भेंडी बाजारातील प्रसिद्ध नूर मोहम्मदी हॉटेलचाही समावेश आहे.

YouTube video player

 तपासणीत गंभीर त्रुटींचा पर्दाफाश

FDAच्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान मुंबईतील अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटची पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी फूड स्टोरेजकडे दुर्लक्ष, अस्वच्छ किचन, एक्सपायरी डेट झालेले पदार्थ, तसेच अन्न सुरक्षा आणि त्यासंबंधित कायद्याचे उल्लंघन आढळून आले. त्यामुळे संबंधित हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या विरोधात तातडीने कारवाई करण्यात आली.

 'शालिमार हॉस्पिटॅलिटी'चा परवाना रद्द

भेंडी बाजारातील शालिमार हॉस्पिटॅलिटीला यापूर्वी फूड सेफ्टीसंदर्भात नोटीस देण्यात आली होती. मात्र पुर्नतपासणीत तब्बल 25 गंभीर त्रुटी कायम असल्याचे आढळून आले. यामुळे हॉटेलचा अन्न सुरक्षा परवाना रद्द करण्यात आला.

नूर मोहम्मदी हॉटेलवरही कारवाई

मुंबईतील प्रसिद्ध नूर मोहम्मदी हॉटेलमध्ये किचनमध्ये अस्वच्छता, तेलाचे जाड थर, कीटक, कच्च्या मालाची अयोग्य साठवणूक आणि पुरवठादारांच्या नोंदींचा अभाव आढळून आला. तसेच पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या. असा सगळा प्रकार हॉटेलमध्ये असल्याने नूर मोहम्मदीचाही परवाना रद्द करण्यात आला.

रहमानिया रेस्टॉरंटचाही परवाना रद्द

उमरखाडी येथील रहमानिया रेस्टॉरंटमध्येही फूड स्टोरजसाठी अपुरी व्यवस्था, गंजलेली उपकरणे, अस्वच्छता आढळून आली. त्यामुळे या हॉटेलवरही कठोर कारवाई करण्यात आली.

नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षेचे नियम आणि ग्राहकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.