ठाकरे गटातील ७ खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कृपाल तुमाने यांनी 'ऑपरेशन टायगर' अंतिम झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे, तर उदय सामंत यांनी असे काहीही नसल्याचे म्हटले आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.
राज्यात सद्यपरिस्थितीत कुठल्याही निवडणूका नसताना ठाकरे गटात परत फूट पडत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील ७ खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या सांगण्यात येतंय. आमदार कृपाल तुमाने यांनी गौप्यस्फोट केला आहे.

तुमाने काय म्हणाले?
कृपाल तुमाने यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, ऑपरेशन टायगर फायनल झाले आहे, फक्त या आमदार व खासदारांच्या पक्ष प्रवेशाची तारीख ठरायची आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर शिवसेना उबाठा पक्षातील आमदार, खासदार नाराज असल्याने ते शिवसेनेत प्रवेश करत आहे.
उदय सामंत ऑपरेशन टायगरबाबत काय म्हणाले?
आमची उबठाच्या कोणत्याही खासदारासोबत मिटिंग झालेली नाही, अजून कोणाशीही संपर्क झाला नाही. आम्हाला ऑपरेशन टायगरची गरज नसल्याचं विधान उदय सामंत यांनी केलं आहे. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना उबाठाच अस्तित्व त्यांनी टिकवून ठेवलंय असं मोजक्या शब्दात सांगितलं.
दानवे काय म्हणाले?
ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदारांच्या वेगळ्या हालचाली चालू आहेत. याबाबतच्या चर्चा सोशल मीडियात अनेक दिवसांपासून सुरु आहेत. याबद्दल बोलताना रावसाहेब दानवे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील गट वेगळा होतो का नाही हे तेच ठरवतील. अजून तरी कोणताही गट स्थापन झालेला नाही असं दानवे यांनी म्हटलं आहे.


