- Home
- Maharashtra
- रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! लवकरच ट्रॅकवर धावणार दोन नवीन 'स्लीपर वंदे भारत'; लांब पल्ल्याचा प्रवास होणार हायटेक
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! लवकरच ट्रॅकवर धावणार दोन नवीन 'स्लीपर वंदे भारत'; लांब पल्ल्याचा प्रवास होणार हायटेक
New Sleeper Vande Bharat Train: रेल्वेच्या ताफ्यात 2 नवीन स्लीपर वंदे भारत गाड्या दाखल होणारय. या गाड्या मार्च २०२६ पर्यंत सेवेत येण्याची शक्यता असून त्या दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता यांसारख्या प्रमुख मार्गांवर धावतील.

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! लवकरच ट्रॅकवर धावणार दोन नवीन 'स्लीपर वंदे भारत'
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आता आणखी दोन नवीन स्लीपर वंदे भारत गाड्या दाखल होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. हावडा ते कामाख्या या पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर, आता रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाला मोठी गती दिली आहे. मार्च २०२६ अखेरपर्यंत दोन नवीन रेक प्रवाशांच्या सेवेत येण्याची दाट शक्यता आहे.
प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार!
सध्याच्या वंदे भारत गाड्या प्रामुख्याने बसून प्रवासासाठी (Chair Car) आहेत, मात्र लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 'स्लीपर' मॉडेल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
चेन्नईमध्ये निर्मिती: या गाड्यांची बांधणी चेन्नई येथील रेल्वे कारखान्यात युद्धपातळीवर सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत तिसरा आणि चौथा रेक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आरामदायी प्रवास: प्रवाशांच्या सूचना लक्षात घेऊन या नवीन कोचेसमध्ये आधुनिक बदल केले जात आहेत.
या मार्गांवर सुरू होणार 'स्लीपर' सेवा?
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासन देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गांवर या गाड्या सुरू करण्याचा विचार करत आहे. यामध्ये प्रामुख्याने
दिल्ली - मुंबई
दिल्ली - कोलकाता
दिल्ली - श्रीनगर
दिल्ली - अमृतसर
भविष्यातील 'पॅन्ट्री कार' आणि २४ कोचेसचे नियोजन
केवळ १६ कोचेसवर न थांबता, भविष्यात प्रवाशांच्या सोयीसाठी २४ कोचेस आणि इन-बिल्ट पॅन्ट्री कार असलेल्या वंदे भारत ट्रेन तयार करण्याची रेल्वेची योजना आहे. यामुळे राजधानी आणि एक्स्प्रेस गाड्यांना एक सक्षम आणि वेगवान पर्याय उपलब्ध होईल.
अंतिम मुदत आणि आव्हाने
करारानुसार मार्चपर्यंत १० रेक देण्याचे नियोजन होते, मात्र तांत्रिक बाबींमुळे सध्या दरमहा एक रेक या गतीने उत्पादन सुरू राहणार आहे. त्यामुळे मार्च २०२६ पर्यंत दोन नवीन गाड्या ताफ्यात येणे निश्चित मानले जात आहे.

