शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथे एका हिंदू कुटुंबावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपींनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

शिरूर | प्रतिनिधी महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा होत असतानाच शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी (उचाळेवस्ती) येथे धार्मिक सलोख्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. राहुल गायकवाड आणि त्यांच्या पत्नी नयना गायकवाड या हिंदू कुटुंबावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सात जणांविरोधात शिरूर पोलिसात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

धर्माअंताचा दबाव की लालसेचं जाळं?

गायकवाड दांपत्याच्या म्हणण्यानुसार, “बायबल वाचा, ख्रिश्चन धर्म स्वीकारा आणि तुम्हाला आर्थिक मदत दिली जाईल,” अशा शब्दांत आमिष दाखवून धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकण्यात आला. हे केवळ धार्मिक आमिष नव्हते, तर त्यामागे एका संपूर्ण समाजाच्या श्रद्धेवर आघात करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

देवतांची अवहेलना आणि अपमानकारक भाषा

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी हिंदू धर्मातील देवी-देवतांविषयी अपशब्द वापरून त्यांच्या घरातील काळूबाई आणि नरेंद्र महाराज यांच्या फोटोसाठी अश्रद्ध भावनेने हातवारे करत अवमान केला. “तुमच्या देवांनी काय केलं?” असा सवाल करून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘डायल 112’ वरून पोलिसांना बोलावलं

दबाव इतका वाढला की शेवटी राहुल गायकवाड यांनी आपल्या मित्र ओंकार जाधव यांच्या मोबाईलवरून 112 वर कॉल करून पोलिसांकडून मदत मागितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. धर्मस्वातंत्र्य कायद्याचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सामाजिक सलोखा धोक्यात?

या प्रकारामुळे केवळ गायकवाड कुटुंब नव्हे, तर परिसरातील अनेक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. "महाराष्ट्र दिनासारख्या राष्ट्रीय गौरवाच्या दिवशी, एका शांतप्रिय कुटुंबावर धर्मबदलाचा दबाव टाकणे म्हणजे सामाजिक सौहार्दाच्या मुळावर घाव आहे," अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे. 

पुढील तपास सुरू

शिरूर पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, धर्मांतरामागील उद्देश, संघटनांचे संलग्न संबंध, आणि अशा प्रकारांच्या पार्श्वभूमीवर तपास अधिक गतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.