TCS Nashik Case : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) नाशिक युनिटमधील लैंगिक छळ आणि धार्मिक सक्तीच्या प्रकरणात आता नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितांनी ऑफिसमधील अत्यंत विषारी वातावरणाबद्दल सांगितलं असून, तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जात होतं आणि ऑफिसचे पासवर्ड 'अश्लील' भाषेत ठेवले जात होते, असा आरोप केला आहे.

TCS Nashik Case : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) नाशिक युनिटमधील लैंगिक छळ आणि धार्मिक सक्तीच्या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. एका पीडित तरुणीने आरोप केला आहे की, ज्या काळात तिच्यासोबत गैरवर्तन झालं, त्या काळात ऑफिसमधील अंतर्गत सिस्टीमचे पासवर्ड 'अश्लील भाषेत' सेव्ह केले जात होते. या नव्या आरोपामुळे, कंपनीने तक्रारी कशा हाताळल्या आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

महिला आयोगासमोर नुकताच आपला जबाब नोंदवणाऱ्या या तरुणीने सांगितलं की, तिने नाशिकच्या बीपीओ युनिटमध्ये ट्रेनिंगसाठी प्रवेश केल्यापासूनच आरोपी रझा रफिक मेमन तिला मानसिक त्रास देत होता, तिच्याशी घाणेरड्या भाषेत बोलायचा आणि चुकीचं वागत होता. तिच्या म्हणण्यानुसार, तिला कामाच्या बहाण्याने केबिनमध्ये बोलावून तिच्याशी असभ्य भाषेत बोललं जायचं आणि तिच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या कमेंट्स केल्या जायच्या.

सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे, ऑफिसमध्ये वापरले जाणारे अधिकृत पासवर्ड 'अश्लील भाषेत' ठेवले जात होते. यावरून ऑफिसमधील वातावरण किती विषारी आणि अपमानास्पद होतं, हे दिसून येतं. या प्रकारची चुकीची वागणूक अनेक वर्षांपासून युनिटमध्ये सर्रासपणे सुरू होती का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

पीडितेने सांगितले की, जेव्हा तिने तिच्या रिपोर्टिंग मॅनेजरकडे याबाबत तक्रार केली, तेव्हा तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. मदत मिळण्याऐवजी परिस्थिती आणखी बिघडली. त्यानंतर लगेचच, इतर दोन कर्मचाऱ्यांनी तिला डिजिटली स्टॉक करण्यास (ऑनलाइन पाळत ठेवण्यास) आणि ऑफिसमध्ये तिच्याबद्दल अफवा पसरवण्यास सुरुवात केली. या कृत्यांमुळे कामाच्या ठिकाणी तिला एकटं पाडण्यात आलं आणि तिच्यासाठी वातावरण असह्य झालं.

हे संपूर्ण प्रकरण तेव्हा समोर आलं, जेव्हा दुसऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने तिचा सहकारी दानिश शेखवर लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला. दानिश आधीच विवाहित होता, ही गोष्ट त्याने लपवली होती. पोलिसांनी नंतर सांगितले की, 2022 ते 2026 या काळात नाशिक ऑफिसमधील अनेक कर्मचाऱ्यांकडून अशाच प्रकारे मानसिक आणि लैंगिक छळ झाल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी केल्या आहेत.

या प्रकरणाबद्दल बोलताना एका कंत्राटी कर्मचाऱ्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, हे प्रकार काही एकाच व्यक्तीपुरते मर्यादित नव्हते. "'हिंदू मुलींना गर्लफ्रेंड बनवा आणि त्यांच्याशी लग्न करा', असं ते म्हणायचे. 'तुमचा धर्म बदला' असं सांगून ते त्यांच्या धर्माबद्दल बोलायचे," असा आरोप त्याने ऑफिसमधील एका विशिष्ट पॅटर्नबद्दल बोलताना केला.

आणखी एका माजी कर्मचाऱ्यानेही ऑफिसमधील त्रासदायक वातावरणाबद्दल सांगितले, "सर्व आरोपी, विशेषतः त्यांची बोलण्याची पद्धत अत्यंत असभ्य होती. मुलींना टीएल डेस्कवर बोलावून अशा घाणेरड्या भाषेत बोललं जायचं, ज्याची कोणत्याही प्रोफेशनल ऑफिसमध्ये कल्पनाही करता येणार नाही."

पोलिसांनी आतापर्यंत सात कर्मचाऱ्यांना अटक केली आहे, ज्यात सहा पुरुष आणि एचआर विभागातील एका महिलेचा समावेश आहे. पोलीस विनयभंग, पाळत ठेवणे, कामाच्या ठिकाणी धमकावणे आणि धार्मिक सक्तीचा प्रयत्न यासह नऊ वेगवेगळ्या तक्रारींचा तपास करत आहेत. तपास सुरू असल्याने अनेक आरोपींना निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे आता भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा आणि कंपन्यांमधील अंतर्गत तक्रार निवारण समित्या खरोखर प्रभावीपणे काम करतात का, यावर एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. पीडितांनी पुढे येऊन आवाज उठवण्यापूर्वी, सुरुवातीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं गेलं का, ज्यामुळे हे गैरवर्तन अनेक वर्षे चालू राहिलं, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.