अजित पवार आणि मी अजूनही बहिण-भाऊ आहोत, असं सांगत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. पक्षाच्या आणि शरद पवारांच्या निर्णयालाच मान्यता देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा एकदा गाजू लागली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बारामतीत यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

"अजित दादा आणि मी लहानपणापासूनच एकत्र वाढलो आहोत. आम्ही आजही बहिण-भाऊ आहोत," असं सांगत त्यांनी मिटकरी यांच्या सूचनेबाबत कृतज्ञता व्यक्त केली. “त्यांची भावना मोलाची आहे. मी त्याबद्दल आभारी आहे,” असंही त्यांनी नम्रतेने नमूद केलं.

पण जेव्हा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत पत्रकारांनी विचारलं, तेव्हा सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाचा गोप जपून ठेवत स्पष्ट केलं की, "हा निर्णय माझा नाही, तो पक्षाचा आणि पवार साहेबांचा असेल. तेच योग्य निर्णय घेत असतात आणि ते नेहमीच लोकशाही मार्गाने चालतात."

"पवार साहेब जो निर्णय घेतात तो कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्यावरच घेतात. मी स्वतः सगळ्यांशी बोलणार आहे आणि त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेणार आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत असल्याबाबत विचारल्यावर, त्या मिश्किल हसत म्हणाल्या, "मी तरी बारामतीत आहे, बाकी पवार कुठे आहेत हे मला माहिती नाही. मी इथून इंदापूरला जाणार आहे."

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसंदर्भात त्या म्हणाल्या, "आज संध्याकाळी पाच वाजता बैठक आहे. या निवडणुकीत राजकारण आणायचं नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार आहोत." यासंदर्भात शरद पवार कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधींच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना, सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राहुल गांधींनी लेख लिहण्याआधी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. आयोगाच्या उत्तराची आम्ही प्रतीक्षा करतो आहोत. राहुल गांधी असोत वा देवेंद्र फडणवीस दोघांनाही आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे."

सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसोबतच्या संबंधांबद्दल खुलेपणाने बोलताना, एकत्रीकरणाच्या निर्णयाचा गुढ उलगडण्याचं काम मात्र शरद पवारांवर सोपवलं आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये, त्यांचा प्रत्येक शब्द समोरच्या राजकारणाला दिशा देण्यास पुरेसा ठरत आहे.