- Home
- Maharashtra
- ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांची तारांबळ होणार!, १३ ऑक्टोबरपासून ST कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, काय आहेत मागण्या जाणून घ्या
ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांची तारांबळ होणार!, १३ ऑक्टोबरपासून ST कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, काय आहेत मागण्या जाणून घ्या
ST Bus Andolan News: महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसने 13 ऑक्टोबर 2025 पासून बेमुदत आंदोलनाची घोषणा केली. सुमारे 4000 कोटींच्या थकीत मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असून, यामुळे दिवाळीच्या काळात एस.टी. सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

एस.टी. कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत आंदोलनाचा एल्गार
मुंबई: दिवाळीच्या तोंडावर एस.टी. कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत आंदोलनाचा एल्गार केला आहे. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसने 13 ऑक्टोबर 2025 पासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाची घोषणा केली असून, एस.टी. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या?
महागाई भत्त्याचा फरक (2016 पासून) – 1100 कोटी रु.
वेतनवाढीचा फरक – 2318 कोटी रु.
दिवाळी भेट – प्रत्येकी 17,000 रु.
सण उचल – 12,500 रु.
एकूण थकीत रक्कम – सुमारे 4000 कोटी रु.
(प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वाट्याला सरासरी 3.77 लाख रुपये येतात)
‘मशाल मोर्चा’ने सुरूवात, आंदोलनाची तीव्रता वाढणार
12 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजता दादरच्या टिळक भवन येथे "मशाल मोर्चा" काढून आंदोलनाची सुरुवात होणार आहे. या मोर्चाचे पुढे रूपांतर बेमुदत ठिय्या आंदोलनात होणार असून, त्याचा थेट परिणाम एस.टी. प्रवासावर होऊ शकतो.
संघटनेचा प्रशासनाला इशारा
श्रीरंग बरगे, सरचिटणीस महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, "जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल व त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील." त्यांनी आरोप केला की, “ही रक्कम कर्मचाऱ्यांना न देता ती हडप करण्याचा डाव प्रशासन रचत आहे.”
प्रवाशांनो सावधान! दिवाळीत प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता
या आंदोलनामुळे दिवाळीच्या काळात एस.टी. सेवा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी वाहतूक पर्यायांचा विचार करावा लागू शकतो.
मागण्या पूर्ण न झाल्यास, राज्यभरात बेमुदत आंदोलन
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या हजारो कोटींच्या थकीत मागण्या पूर्ण न झाल्यास, राज्यभरात बेमुदत आंदोलन होणार! प्रवाशांची गैरसोय टाळायची असेल, तर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

