- Home
- Maharashtra
- Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं आता टेन्शन फ्री! मध्य रेल्वेच्या १७६ 'समर स्पेशल' गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं आता टेन्शन फ्री! मध्य रेल्वेच्या १७६ 'समर स्पेशल' गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई-पुण्याहून उत्तर भारतात १७६ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, तांत्रिक कामामुळे १२ मार्चच्या रात्री मुंबईतील तिकीट बुकिंग प्रणाली बंद राहणार आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं आता टेन्शन फ्री!
मुंबई: उन्हाळ्याची सुट्टी लागली की मुंबई-पुण्यात राहणाऱ्या चाकरमान्यांना वेध लागतात ते गावाकडच्या मातीचे. मात्र, रेल्वेच्या वेटिंग लिस्टमुळे अनेकांचा हिरमोड होतो. प्रवाशांची हीच अडचण ओळखून मध्य रेल्वेने एक मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने १७६ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
कुठे आणि किती फेऱ्या?
प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता, मुंबई (CSMT/LTT) आणि पुणे या महत्त्वाच्या स्थानकांवरून उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
सीएसएमटी (CSMT) ते गोरखपूर: ४४ फेऱ्या
एलटीटी (LTT) ते दानापूर: ४४ फेऱ्या
पुणे ते गोरखपूर: ४४ फेऱ्या
पुणे ते दानापूर: ४४ फेऱ्या
महत्त्वाचे थांबे: या विशेष गाड्या प्रवासादरम्यान दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी आणि जबलपूर यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबतील.
आज रात्री तिकीट बुकिंग बंद राहणार!
जर तुम्ही आज रात्री तिकीट काढण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तांत्रिक कामामुळे (डिस्क डीफ्रॅगमेंटेशन) १२ मार्चच्या रात्री ११:४५ ते पहाटे ३:१५ या वेळेत मुंबईतील प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) बंद असेल.
या साडेतीन तासांच्या काळात तिकीट बुकिंग, चार्टिंग आणि रिफंडशी संबंधित कोणतीही सेवा उपलब्ध नसेल. त्यामुळे प्रवाशांनी आपली कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.
बेस्टच्या 'स्मार्ट मीटर'वरून मुंबईत रणकंदन
रेल्वेच्या सुवार्तेसोबतच मुंबईत वीज मीटरचा मुद्दा तापला आहे. बेस्टकडून बसवण्यात येणाऱ्या 'प्रीपेड स्मार्ट मीटर'ला आता राजकीय स्तरातून तीव्र विरोध होत आहे. या मीटरमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागेल, असा दावा करत शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी झाली असून आंदोलनाचे संकेतही देण्यात आले आहेत.

