- Home
- Maharashtra
- महागाईचा 'टोल'धाड! पुणे-सातारा प्रवास महागला; खेडशिवापूर, अनेवाडीला खिसा रिकामा होणार, पण 'या' मार्गावर दिलासा!
महागाईचा 'टोल'धाड! पुणे-सातारा प्रवास महागला; खेडशिवापूर, अनेवाडीला खिसा रिकामा होणार, पण 'या' मार्गावर दिलासा!
Pune-Satara highway toll increase: पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर आणि अनेवाडी टोलनाक्यांवर १ एप्रिल २०२६ पासून ५% दरवाढ लागू झाली आहे, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. सुविधांचा अभाव असताना ही वाढ झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

महागाईचा 'टोल'धाड! पुणे-सातारा प्रवास महागला
पुणे: आधीच इंधन दरवाढीने होरपळणाऱ्या सामान्य जनतेला आता टोलच्या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) १ एप्रिल २०२६ पासून पुणे-सातारा महामार्गावरील टोल दरात सुमारे ५ टक्क्यांची वाढ केली आहे. खेडशिवापूर आणि अनेवाडी टोलनाक्यावर आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पुणे-सातारा प्रवास, कुठे किती वाढ?
खेडशिवापूर आणि अनेवाडी टोलनाक्यांवर नव्या दरपत्रकानुसार वाहनांच्या श्रेणीनुसार बदल झाले आहेत. विशेष म्हणजे सुविधांचा अभाव असताना ही दरवाढ लादल्याने वाहनधारक नाराज आहेत.
१. अनेवाडी टोलनाका (नवे दर)
कार/जीप/व्हॅन: ८५ रुपये (एकेरी) आणि १३० रुपये (दुहेरी) - या दरात बदल नाही.
मिनी बस/हलकी मालवाहू वाहने: १४० रुपये (एकेरी) आणि २१० रुपये (दुहेरी).
जड वाहने (मल्टि-अॅक्सल): ४६५ रुपये (एकेरी) आणि ६९५ रुपये (दुहेरी).
अतिविशाल वाहने (७+ अॅक्सल): ५६५ रुपये (एकेरी) आणि ८४५ रुपये (दुहेरी).
२. खेडशिवापूर टोलनाका (नवे दर)
कार: १२५ रुपये (एकेरी) आणि १९० रुपये (दुहेरी).
बस/ट्रक: ४२५ ते ६४० रुपये.
मल्टि-अॅक्सल वाहने: ६६५ ते १००० रुपये.
सांगली-सोलापूरकरांना 'अच्छे दिन'; तासवडे-किणीतही दिलासा!
एकडे पुणे-सातारा प्रवास महागला असताना, दुसरीकडे काही मार्गांवर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
सांगली-सोलापूर: रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील नव्या दरांमध्ये कपात झाल्याने सांगली-सोलापूर प्रवास काहीसा स्वस्त झाला आहे.
तासवडे आणि किणी नाका
कराडजवळील तासवडे आणि कोल्हापूरजवळील किणी टोलनाक्यावर दरवाढ करण्यात आलेली नाही. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याचा फटका प्रवाशांना बसत असल्याने जुन्या दरानेच वसुली सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
सुविधा शून्य, मग वसुली का?
महामार्गावर पिण्याचे स्वच्छ पाणी नाही, स्वच्छतागृहांची दुरवस्था आहे आणि खड्ड्यांमुळे प्रवास त्रासदायक होतोय. अशा स्थितीत ५ टक्के जादा टोल कशासाठी? असा सवाल आता सामान्य वाहनचालक विचारत आहेत.

