संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे-पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातील मुक्कामानंतर दिवे घाट मार्गे सासवडकडे रवाना झाली आहे. पालखी लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे-पंढरपूर महामार्गासह अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक नियोजनाची अधिसूचना जारी केली आहे.

पुणे-पंढरपूर महामार्गावरील वाहतूक वळवली
पालखी मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे, बारामती, सातारा, फलटण, लोणंद आणि जेजुरीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. बेलसर फाटा, मोरगाव चौक, निरा, कोथळे चौक, पारगाव मेमाणे आणि सासवड परिसरात काही कालावधीसाठी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे वाहने पर्यायी मार्गांकडे वळवली जाणार आहेत. 10 ते 15 जुलैदरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
प्रमुख मार्गांवर निर्बंध
जेजुरी, सासवड, मोरगाव, निरा आणि सुपा या भागांतील काही महत्त्वाच्या रस्त्यांवर पालखी सोहळ्यादरम्यान सर्वसामान्य वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. पुण्याकडे जाणारी तसेच सातारा, फलटण, बारामती आणि लोणंदकडे जाणारी वाहने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गाने सोडण्यात येतील.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
वाहनचालकांनी प्रवासापूर्वी वाहतूक बदलांची माहिती घेऊनच मार्ग निश्चित करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.


