- Home
- Maharashtra
- पुणे–मनमाड प्रवाशांसाठी मोठा दिलासा! रेल्वेने सुरू केलं महत्त्वाचं काम, प्रवासाचा वेळ लवकरच घटणार
पुणे–मनमाड प्रवाशांसाठी मोठा दिलासा! रेल्वेने सुरू केलं महत्त्वाचं काम, प्रवासाचा वेळ लवकरच घटणार
Pune-Manmad Railway Line Upgrade : पुणे-मनमाड रेल्वे मार्गावर उच्च क्षमतेचे नवीन रूळ टाकण्याचे काम सुरू असून, यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. या सुधारणांमुळे गाड्यांचा वेग ताशी ११० किमीवरून १३० किमीपर्यंत वाढवणे शक्य होईल.

पुणे–मनमाड प्रवाशांसाठी मोठा दिलासा!
पुणे : पुणे–मनमाड हा राज्यातील अत्यंत वर्दळीचा रेल्वे मार्ग वापरणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. या मार्गावरील रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उच्च क्षमतेचे नवीन रूळ टाकण्याचे काम हाती घेतले आहे. या सुधारणांमुळे भविष्यात पुणे–मनमाड दरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
५५० जीएमटी क्षमतेचे भक्कम रूळ, वेगात होणार वाढ
रेल्वे विभागाकडून बसवण्यात येणारे नवीन रूळ ५५० जीएमटी (ग्रॉस मिलियन टन) क्षमतेचे असून, ते सुमारे ५५ कोटी टन वजनाचा भार सहजपणे सहन करू शकतात. यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक मजबूत आणि सुरक्षित होणार असून, गाड्यांचा वेग वाढवण्यासही मोठी मदत मिळणार आहे.
अवघ्या ३५ दिवसांत ९ किमी रुळांचे काम पूर्ण
पुणे रेल्वे विभागात पुणतांबा ते कन्हेगाव स्थानकांदरम्यान हे काम पीक्यूआरएस (Plasser Quick Relaying System) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जलद गतीने सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, नियमित रेल्वे वाहतूक सुरू ठेवत ठराविक कालावधीचे ब्लॉक घेऊन केवळ ३५ दिवसांत ९ किलोमीटर रुळांचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.
११० किमीवरून १३० किमी प्रतितास वेग शक्य
यापूर्वी या मार्गावर ५२ किलो वजनाचे रूळ वापरले जात होते. आता त्याऐवजी अधिक मजबूत ६० किलो वजनाचे रूळ बसवण्यात येत आहेत. रुळांची गुणवत्ता आणि क्षमतावाढ झाल्यामुळे रेल्वे गाड्यांचा सरासरी वेग ताशी ११० किमीवरून १३० किमीपर्यंत नेणे शक्य होणार आहे. परिणामी, पुणे–मनमाड प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल.
अपघातांचा धोका कमी, दीर्घकाळ देखभालमुक्त मार्ग
अल्ट्रासॉनिक टेस्टिंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानामुळे रुळांतील तडे वेळेत ओळखता येणार असून, रुळ तुटून होणाऱ्या अपघातांना आळा बसेल. तसेच अवजड मालगाड्यांमुळे रुळांना होणारे नुकसानही कमी होणार आहे. एकदा हे नवीन रूळ पूर्णपणे बसवले की, पुढील १५ ते २० वर्षे या मार्गावर पुन्हा रुळ बदलण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे देखभालीसाठी लागणारा वेळ वाचेल आणि गाड्यांचे वेळापत्रक अधिक अचूक राहील.

