- Home
- Maharashtra
- Pune IT Job Scam: सावधान! पुण्यात IT जॉबच्या नावाखाली कोट्यवधींचा 'गेम'; ३,५०० तरुणांची फसवणूक, असे जाळ्यात ओढले जायचे सुशिक्षित बेकार
Pune IT Job Scam: सावधान! पुण्यात IT जॉबच्या नावाखाली कोट्यवधींचा 'गेम'; ३,५०० तरुणांची फसवणूक, असे जाळ्यात ओढले जायचे सुशिक्षित बेकार
Pune IT Job Scam: पुण्यातील हिंजवडी, विमाननगर, बाणेर परिसरात आयटी जॉबच्या नावाखाली एक मोठे रॅकेट उघडकीस आले, ज्यात हजारो तरुणांना कोट्यवधीचा गंडा घातलाय. नोकरीसाठी लाखो रुपये उकळून काही महिने पगार देऊन कंपन्या गायब झाल्याने अनेक तरुण कर्जबाजारी झाले.

सावधान! पुण्यात IT जॉबच्या नावाखाली कोट्यवधींचा 'गेम'
पुणे: "चांगल्या कंपनीत नोकरी, ६ ते ११ लाखांचे पॅकेज आणि आयटी क्षेत्रातील करिअर..." या स्वप्नांना भुलून पुण्यातील शेकडो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पुण्यातील हिंजवडी, विमाननगर आणि बाणेर परिसरातून चालणाऱ्या एका मोठ्या 'आयटी जॉब रॅकेट'चा पर्दाफाश झाला असून, यामध्ये हजारो सुशिक्षित तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
'पे-फॉर-वर्क'चा असा होता सापळा
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे तरुणांना नोकरी देण्यासाठी चक्क १.५ लाख ते ३.५ लाख रुपयांपर्यंतची लाच मागितली जात होती. सृष्टी (नाव बदलले आहे) नावाच्या एका तरुणीने ११ लाखांच्या पॅकेजसाठी ३.२५ लाख रुपये भरले. तिला महिनाभर पगार मिळाला, पण त्यानंतर कंपनी गायब झाली. सृष्टीसारखे शेकडो तरुण आता पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत.
या कंपन्यांवर ओढावली कारवाई
पुणे पोलिसांनी आतापर्यंत अनेक कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून मुख्य सूत्रधार अटकेत आहेत.
Flynaut SaaS (हिंजवडी): या कंपनीवर तब्बल ३५४ एफआयआर दाखल झाले असून ६ कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.
QuantumSoft (विमाननगर): इथे १०० हून अधिक तक्रारी आल्या असून ८०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला आहे.
DataTech Labs (बावधन): पगार न देणे आणि कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे आरोप या कंपनीवर आहेत.
फसवणुकीची कार्यपद्धती (Modus Operandi)
१. फेक कन्सल्टंट: जॉब पोर्टलवरून डेटा चोरून कन्सल्टंट तरुणांना कॉल करायचे.
२. पॅकेजचे आमिष: ६ लाखांच्या पॅकेजसाठी २.५ लाख आणि ११ लाखांच्या पॅकेजसाठी ३.२५ लाख अशी 'रेट लिस्ट'च तयार होती.
३. दोन महिन्यांचा पगार: विश्वास संपादन करण्यासाठी पहिले १-२ महिने पगार दिला जायचा, त्यानंतर पगार बंद आणि संपर्काचे सर्व मार्ग ब्लॉक!
४. टार्गेट: प्रामुख्याने यवतमाळ, अमरावती, नागपूर आणि अहमदनगर सारख्या छोट्या शहरांतील मध्यमवर्गीय तरुण या रॅकेटचे बळी ठरले.
दागिने विकले, कर्ज काढले... पण हाती काय?
अनेक तरुणांनी नोकरीसाठी शेती गहाण ठेवली, आईचे दागिने विकले तर काहींनी चढ्या व्याजाने कर्ज काढले. आता नोकरीही गेली आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. विशेष म्हणजे, या कंपन्यांनी दिलेली अनुभवाची प्रमाणपत्रे (Experience Letters) बनावट ठरल्याने इतर कंपन्यांमध्येही या तरुणांना नोकरी मिळवणे कठीण झाले आहे.
सरकारचे कडक पाऊल
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने SIT (विशेष तपास पथक) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आयटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी स्वतंत्र लवाद (Tribunal) स्थापन करण्याची घोषणा गृहविभागाने केली आहे.
आयटी कर्मचारी युनियनचा (FITE) इशारा
"केवळ कंपन्यांच्या मालकांना अटक करून चालणार नाही, तर या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या ३० हून अधिक कन्सल्टंटचा शोध घेऊन त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले पाहिजेत."

