- Home
- Maharashtra
- पत्नीपीडित आहात? आता मिळणार न्याय!, 'पुरुष स्वाभिमान फाउंडेशन' तर्फे उल्हासनगरमध्ये राज्यस्तरीय महामेळाव्याचे आयोजन
पत्नीपीडित आहात? आता मिळणार न्याय!, 'पुरुष स्वाभिमान फाउंडेशन' तर्फे उल्हासनगरमध्ये राज्यस्तरीय महामेळाव्याचे आयोजन
पुरुष स्वाभिमान फाउंडेशनतर्फे उल्हासनगरमध्ये १३ सप्टेंबर २०२५ रोजी पत्नीपीडित पुरुषांसाठी राज्यस्तरीय मेळावा आयोजित. मेळाव्यात कायदेशीर मार्गदर्शन, मानसिक आधार आणि 'पुरुष आयोगा'च्या स्थापनेवर चर्चा होणार आहे.

ठाणे : आजवर अनेकदा महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांना होणाऱ्या त्रासाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, अनेक पुरुषही त्यांच्या वैवाहिक जीवनात मानसिक आणि शारीरिक छळाचा सामना करतात. याच पत्नीपीडित पुरुषांना न्याय मिळवून देण्यासाठी 'पुरुष स्वाभिमान फाउंडेशन' या संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेतर्फे उल्हासनगर-4 कल्याण येथे 13 सप्टेंबर 2025 रोजी पत्नीपीडित पुरुषांसाठी एक भव्य राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
पुरुषांच्या वेदनांना आता मिळेल व्यासपीठ
समाजात पुरुषांना होणारा त्रास किंवा त्यांच्यावर होणारा अन्याय याबद्दल फारशी चर्चा होताना दिसत नाही. अनेक पुरुष खोट्या कौटुंबिक तक्रारींचे बळी ठरतात, ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास, मानहानी, पोटगीचा दबाव आणि मुलांपासून दूर राहण्याची वेदना सहन करावी लागते. याच पार्श्वभूमीवर, या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उल्हासनगर-4 कल्याण येथे होणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांतील पत्नीपीडित पुरुष, कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
मेळाव्यातील महत्त्वाचे मुद्दे
हा मेळावा केवळ एकत्र येण्यासाठी नसून, पुरुषांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी मार्गदर्शन देण्यावर लक्ष केंद्रित करेल. मेळाव्यामध्ये खालील विषयांवर सखोल चर्चा होईल.
कायदेशीर मार्गदर्शन: खोट्या आरोपांपासून बचाव करण्यासाठीचे कायदेशीर उपाय.
प्रक्रियेची माहिती: पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेत काय काळजी घ्यावी.
मानसिक आधार: समुपदेशन सत्रांद्वारे मानसिक आधार दिला जाईल.
'पुरुष आयोगा'ची मागणी: महिलांसाठी 'महिला आयोग' आणि मुलांसाठी 'बाल हक्क आयोग' आहे, त्याचप्रमाणे पुरुषांसाठीही 'पुरुष आयोग' स्थापन करण्याची मुख्य मागणी या मेळाव्यात केली जाईल.
पुरुषही माणूस आहे, त्यालाही भावना आहेत, त्याचाही आवाज आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे,” असं मत संघटनेचे पदाधिकारी बालाजी डोर्नपल्ले यांनी व्यक्त केलं. या मेळाव्याचे हे तिसरे वर्ष असून याआधी नाशिक आणि दिल्ली येथे अशाच प्रकारचे मेळावे घेण्यात आले आहेत.

