राज्यातील FYJC प्रवेश प्रक्रिया १००% डिजिटल स्वरूपात राबवण्यात येणार आहे. मात्र, महाविद्यालयांकडून डेटा अपलोड न झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

मुंबई | प्रतिनिधी राज्यातील सर्वप्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) प्रवेश प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरूवात झाली असून, यंदाचा प्रवेश हंगाम १०० टक्के डिजिटल स्वरूपात राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतून केवळ ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बंधनकारक केल्यामुळे, ही एक ऐतिहासिक पावले मानली जात आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मात्र, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयाला महाविद्यालयांकडून अद्याप पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक महाविद्यालयांनी अद्याप त्यांच्या डेटा आणि अभ्यासक्रमाची अद्ययावत माहिती प्रणालीवर अपलोड केलेली नाही, त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल का, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

शालेय शिक्षण विभागाने यंदा पहिल्यांदाच ही प्रक्रिया राज्यव्यापी केली आहे. यापूर्वी केवळ मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती अशा निवडक शहरांपुरतेच केंद्रीकृत प्रवेश प्रणाली मर्यादित होती. राज्य शिक्षण मंडळाचे अधिकारी सांगतात की, “विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि वेळ वाचवणारी असेल. यामुळे ऑफलाईन अर्ज, रांगा आणि भ्रष्टाचारालाही आळा बसेल.”

परंतु, महाविद्यालयांचा डेटा लोड न होणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाच्या अभावामुळे माहिती फॉर्म चुकीचा भरला जाण्याची भीती आणि ग्रामीण भागात इंटरनेट व सुविधा यांची मर्यादा – हे सर्व घटक यंदाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसमोरील आव्हान ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कॉलेज प्रशासनांना लवकरात लवकर त्यांची माहिती प्रणालीवर अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी हेल्पडेस्क, मार्गदर्शन केंद्रे आणि व्हिडिओ ट्युटोरियल्स उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली आहे.