- Home
- Maharashtra
- MSRTC ST Bus Smart Card: लालपरीचा प्रवास आता हायटेक! खिशात सुट्टे पैसे ठेवण्याची कटकटी मिटणार; प्रवाशांना मिळणार 'स्मार्ट' कार्ड
MSRTC ST Bus Smart Card: लालपरीचा प्रवास आता हायटेक! खिशात सुट्टे पैसे ठेवण्याची कटकटी मिटणार; प्रवाशांना मिळणार 'स्मार्ट' कार्ड
MSRTC ST Bus Smart Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आता प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) सादर करत आहे. या डिजिटल कार्डमुळे रोख व्यवहारांची गरज संपणार असून, विविध शासकीय सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य असेल.

एसटीचा प्रवास आता हायटेक! खिशात सुट्टे पैसे ठेवण्याची कटकटी मिटणार
मुंबई : लालपरीने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक मोठी खूशखबर आहे! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आता कात टाकली असून, पारंपरिक तिकीट प्रणालीला 'डिजिटल' टच दिला आहे. प्रवाशांना आता प्रवासात तिकीटाऐवजी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) मिळणार असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या महत्त्वाकांक्षी निर्णयाची घोषणा केली आहे.
'एक कार्ड, अनेक फायदे', काय आहे ही नवीन प्रणाली?
हे केवळ एक कार्ड नसून ते प्रवाशांच्या सोयीचे एक 'स्मार्ट वॉलेट' असेल. यामुळे बसमध्ये कंडक्टरला सुट्टे पैसे मागण्याची किंवा रोख व्यवहार करण्याची गरज उरणार नाही. विशेष म्हणजे, शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता हे कार्ड अनिवार्य असणार आहे.
कोणाला मिळणार हे खास 'NCMC' कार्ड?
राज्य सरकारने विविध समाजघटकांसाठी हे कार्ड उपलब्ध करून दिले आहे.
विद्यार्थी: शाळा आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 'सरल' आयडीशी लिंक केलेले कार्ड मिळेल.
महिला व ज्येष्ठ नागरिक: आधार कार्डशी संलग्न असलेले कार्ड महिलांना आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना दिले जाईल.
दिव्यांग प्रवासी: युडीआयडी (UDID) क्रमांकाशी जोडून विशेष कार्डाचे वितरण होईल.
पुरस्कारार्थी व पत्रकार: अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्य पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या मुख्यालय आगारातून हे कार्ड मिळेल.
कार्डची किंमत आणि रिचार्ज सोय
नव्या कार्डचा दर: ₹१९९ (GST सह).
जुन्या कार्डवर सवलत: तुमच्याकडे जुने स्मार्ट कार्ड असल्यास ते जमा करून फक्त ₹१४९ मध्ये नवीन कार्ड घेता येईल.
रिचार्ज: किमान ₹१०० पासून पुढे ५० च्या पटीत तुम्ही हे कार्ड रिचार्ज करू शकता.
कुठे मिळेल? बसस्थानके, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त केलेल्या ३००० हून अधिक एजंट्सकडे नोंदणी करता येईल.
"सुट्ट्या पैशांची चिंता आता इतिहासजमा!"
"एसटी महामंडळाचा हा निर्णय म्हणजे डिजिटल युगाकडे टाकलेले मोठे पाऊल आहे. सवलतींच्या नोंदीमध्ये पारदर्शकता येईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल. रोखविरहित व्यवहारांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनाही आधुनिक प्रवासाचा अनुभव घेता येईल," असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

