पुण्यातील केतन अग्रवाल तरुणाची हत्या झाल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. प्रेमासाठी केतनची हत्या केल्यानंतर आता मात्र सिया आणि चेतन दोघंही एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.
पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल या तरुणाची त्याच्याच होणाऱ्या पत्नीने हत्या केली. या घटनेने केवळ पुणे, महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. लोहगड किल्ल्यावरुन केतनला त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने ढकलून त्यांची हत्या केली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या पथकासमोर अनेक गोष्टी समोर येत असून नवी आव्हानंही उभी राहत आहेत.

सिया गोयलला केतन अग्रवालशी लग्न करायचं नव्हतं. तिचं चेतन चौधरी नावाच्या तरुणावर प्रेम होतं. दोघांच्या प्रेमप्रकरणातूनच केतनची हत्या करण्यात आली. केतनला संपवण्याआधी दोघं सतत फोनवर बोलत होते. दोघांच्या कॉल रेकॉर्ड्समधून त्या दोघांचे २००० हून अधिक कॉल झाल्याचं समोर आलं. इतक्या वेळा बोलण्याचा कालावधी २३८ तासांचा होता अशी माहिती समोर आली आहे. कॉल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या तपासाद्वारे सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलं आहे.
सिया गोयल आणि चेतन चौधरी दोघांवर खून आणि गुन्हेगारी कटाचा आरोप ठेवण्यात आला आहे. दोघांनाही २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पण एकमेकांच्या प्रेमासाठी तरुणाची हत्या केल्यानंतर आता पोलिसांच्या चौकशीत सिया आणि चेतन दोघं एकमेकांवरच आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केतनच्या हत्येचा कट करण्याआधी सिया आणि चेतन यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन केला होता. पण नंतर सियाने आपल्या कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेच्या चिंतेमुळे पळून जाण्याचा विचार नाकारला. शिवाय केतनच्या हत्येआधी सियाने साखरपुडाही मोडण्याचा प्लॅन केला होता. पण पुन्हा समाजातील कुटुंबाच्या प्रतिष्ठेमुळे त्यांना तो मोडता आला नाही.
पोलिसांच्या चौकशीत चेतनने सांगितलं, की सियासोबत पळून जाणं हाच एक उद्देश होता. पण पळून गेल्यानंतर आपलं कुटुंब आपल्याला कसंही शोधून काढेल या भीतीने सियाने पळून न जाता केतनच्या हत्येचा प्लॅन केला. तर दुसरीकडे सियाने चेतनवर आरोप करत केतनच्या हत्येसाठी तोच जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. हत्येची कल्पना चेतनची होती. १४ जून रोजी केतनला मारण्याचा प्लॅन झाला होता, पण तो फेल झाल्यानंतर चेतन तिच्यासमोर रडला होता. तुला हे जमणार नाही असं म्हणत चेतननेच दुसऱ्यांदा केतनला ढकलण्याची जबाबदारी घेतली असं सियाने पोलीस तपासात सांगितलं.
सियाने केलेल्या हत्येनंतर तिच्या आईची आणि वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणादरम्यान सियाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयातूनच सियाचे वडील प्रवीण गोयल आणि तिच्या आईने, जर आमची मुलगा दोषी असेल तर तिला योग्य ती शिक्षा व्हावी, किंवा तिलाही त्याच कड्यावरुन ढकलून द्यावं अशी प्रतिक्रिया दिली आहे.


