- Home
- Maharashtra
- महाराष्ट्रावर दुहेरी संकट! अवकाळीचा मुक्काम हलणार, पण आता 'हीट वेव्ह'चा तडाखा; जाणून घ्या पुढच्या 48 तासांचा अलर्ट
महाराष्ट्रावर दुहेरी संकट! अवकाळीचा मुक्काम हलणार, पण आता 'हीट वेव्ह'चा तडाखा; जाणून घ्या पुढच्या 48 तासांचा अलर्ट
Maharashtra weather update: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी संकट टळलेले नाही. हवामान विभागाने विदर्भात पावसाचा 'यलो अलर्ट' कायम ठेवला आहे, तर दुसरीकडे कोकण, मुंबईसह अनेक भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! अवकाळीचा मुक्काम हलणार, पण आता 'हीट वेव्ह'चा तडाखा
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाचा जोर आता काहीसा ओसरताना दिसत आहे. मात्र, पावसाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही, तोच आता राज्यावर उष्णतेच्या लाटेचे (Heat Wave) सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी महत्त्वाचा इशारा दिला असून, काही भागांत पावसाची तर काही भागांत उकाड्याची तीव्रता वाढणार आहे.
विदर्भात पावसाचा 'यलो अलर्ट' कायम
विदर्भातील जिल्ह्यांसाठी अद्याप धोका टळलेला नाही. नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तापमानाचा पारा ३२ ते ४० अंशांच्या दरम्यान राहील.
कोकण आणि मुंबई: आता घामाच्या धारा!
मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आता अवकाळीचे ढग गायब झाले असून उष्ण आणि कोरडे हवामान राहील. २२ मार्चपासून उन्हाचा कडाका वाढणार असून, हवामान विभागाने येथे 'उष्ण आणि दमट' हवामानाचा यलो अलर्ट दिला आहे. तापमानाचा पारा ३४ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा: कुठे ऊन, कुठे पाऊस?
पुणे-सातारा: येथे पाऊस विश्रांती घेईल आणि हवामान कोरडे राहील.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर: या भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. सोलापुरात ४८ तासांनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो.
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगरमध्ये हवामान कोरडे राहील, मात्र लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र: उन्हाची ताप वाढणार
नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार भागात आता पावसाचे संकट ओसरले आहे. या जिल्ह्यांमध्ये आता हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचू शकते.
महत्त्वाची टीप
एका बाजूला विदर्भात विजांचा कडकडाट, तर दुसऱ्या बाजूला कोकण-उत्तर महाराष्ट्रात वाढता उकाडा अशा विचित्र हवामानामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि गरज असेल तरच उन्हात बाहेर पडावे.

