राज्यात जालना, डोंबिवलीसह विविध भागांत पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे जालन्यातील शेतकरी खरीप पेरणीसाठी आशान्वित झाले आहेत, तर दुसरीकडे भंडाऱ्यात वीज कोसळून एका महिलेसह २३ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. एल निनो वादळामुळं पाऊस कधी होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मराठवाड्यातील जालना शहरासह आसपासच्या भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रासलेल्या जनतेला आता थंडावा मिळाला आहे.

जालना शहरात झाला वादळी पाऊस
जालना शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस न झाल्यामुळं शेतकरी राजा चिंतेत पडला होता. मात्र आता या झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला लवकरच सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी या पावसाचं स्वागत केलं. आगामी काळात चांगला पाऊस पडेल असं म्हटलं आहे.
भंडाऱ्यात महिला पशुपालकासह २२ शेळ्या आणि एका म्हशीचा मृत्यू
भंडाऱ्यात वीज कोसळून एका महिला पशुपालकासह २२ शेळ्या आणि १ म्हशीचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात या घटना घडल्या आहेत. ५० वर्षीय महिला भीमलता उचीबगले यांच्यावर वीज कोसळल्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या ठिकाणी वीज कोसळल्यामुळे म्हशीचा मृत्यू झाला.
डोंबिवलीत पावसाने लावली हजेरी
सायंकाळच्या सुमारील डोंबिवली फडके रोड आणि गणपती मंदिर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे उकाड्यामुळं हैराण झालेल्या नागरिकांना थंडावा मिळाला आहे. नागपूर शहराच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात चार दिवसांनी पावसाला सुरुवात होणार आहे.


