पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचं पुणे हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. मात्र घाटमाथा, अमरावतीत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
मुंबई : जुलैमध्ये अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसानंतर आता राज्यभर उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. गेला आठवडाभर हीच स्थिती कायम राहिली. अतिवृष्टी झालेल्या भागांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र अनेक जिल्हे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी पुढील पाच दिवसांतील स्थितीबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
घाटमाथ्यावर कमी पाऊस, मैदानी भाग कोरडाच
सानप यांच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसर आणि इतर भागांत फार कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी तो ५ मिमीच्याही खाली पावसाची नोंद झाली आहे आहे. गेल्या 24 तासांत घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस झाला. पण येत्या काही दिवसांत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
तूट भरून निघण्याची शक्यता धूसर
पुढील पाच दिवसांत राज्यभर व्यापक पाऊस पडेल किंवा अतिवृष्टी होईल, अशी कोणतीही शक्यता सध्या दिसत नाही. पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचाच राहण्याचा अंदाज आहे.यामुळे पावसाची तूट भरून निघणं कठीण आहे. तरीही काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात.
बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला कमी दाबाचा पट्टा
बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मात्र त्याचा प्रभाव सध्या ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांपुरताच मर्यादित आहे. "पुढच्या चार-पाच दिवसांत या प्रणालीचा आपल्या भागावर कसलाही परिणाम होणार नाही. हवामानात काही बदल झाल्यास आम्ही त्वरित अपडेट देऊ," असं सानप यांनी म्हटलं आहे.
घाटमाथा आणि अमरावतीत अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, अकोला आणि अमरावती या भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत सोसाट्याचे वारे आणि विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याउलट, उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उकाड्यासह केवळ हलक्या ते मध्यम सरी कोसळणार आहेत.


