राज्यात उष्णतेचा कहर वाढला असून हवामान विभागाने पुढील 24 तास धोकादायक असल्याचा इशारा दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान झपाट्याने वाढत असून, नागपूरमध्ये 'यलो अलर्ट' जारी करत शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात पुन्हा एकदा उष्णतेचा कहर वाढताना दिसत असून पुढील 24 तास अत्यंत धोकादायक ठरण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागात तापमान झपाट्याने वाढत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून अनेक ठिकाणी तापमान 43 अंशांच्या पुढे गेले आहे. नागपूर जिल्ह्यात तर परिस्थिती गंभीर बनली असून उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने याठिकाणी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
क्लासेसला दिली सुट्टी
या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यातही तापमान 40 ते 41 अंशांपर्यंत पोहोचले असून उष्णतेचा तडाखा वाढला आहे. उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत आणि थंड पेयांची मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे.
उष्णतेची लाट कायम राहणार
हवामान खात्याने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 40 ते 44 अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे उकाडा अधिक जाणवणार आहे. याचवेळी काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मात्र, उष्णतेपासून तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


