राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी एनडीएसोबतची युती चूक असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत अंत्यसंस्कार व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करण्याचा संकल्पही केला आहे.

नवी दिल्ली: राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती कार्यक्रमात दिलेली वक्तव्ये सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत. या भाषणात त्यांनी एनडीएसोबत युती करणे ही आमची चूक होती, अशी स्पष्ट कबुली दिली असून, भविष्यात संधी मिळताच सत्ताधाऱ्यांना सत्तेतून दूर करू, असा ठाम इशाराही दिला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमात जानकर यांनी आपल्या राजकीय दिशा आणि ध्येयांचा खुलासा केला. "मेल्यानंतर माझ्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार झाले पाहिजेत, हे माझं अंतिम उद्दिष्ट आहे," असे म्हणत त्यांनी आपली देशपातळीवरील राजकीय महत्वाकांक्षा उघडपणे व्यक्त केली.

राजकीय खंत आणि नव्या दिशा

"आम्ही पूर्वी NDAसोबत गेलो, ती आमची चूक होती," असे स्पष्ट करत जानकरांनी मागील राजकीय निर्णयाबद्दल आत्मपरीक्षण केलं. याच वेळी त्यांनी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब यांच्याकडे बोट दाखवत, "तुमचा पक्ष मोठा होता म्हणून तुम्ही आम्हाला विचारात घेतलं नाही," अशी खंतही व्यक्त केली.

या कार्यक्रमाला समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, काँग्रेसचे राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार अनुपस्थित होते. याकडे अनेकांचं लक्ष गेलं असलं, तरी "जे काही घडतं ते चांगल्यासाठीच," असं सांगत जानकरांनी राजकीय सौजन्य जपलं.

"एक दिवस लाल किल्ल्यावरून भाषण करायचं आहे"

"ज्या दिवशी केंद्र सरकार अहिल्याबाईंची जयंती दिल्लीत साजरी करेल, त्या दिवशी मी ती अमेरिकेत साजरी करेन," असं विधान करत त्यांनी कार्यक्रमाचं महत्त्व फक्त औचित्यापुरतं नसून, दिल्लीतील सत्ता परिवर्तन हेच अंतिम ध्येय असल्याचं स्पष्ट केलं. "एक दिवस लाल किल्ल्यावरून आपलं भाषण झालं पाहिजे," असा ठाम संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

महादेव जानकर यांच्या या थेट आणि ठाम वक्तव्यांनी महाराष्ट्रासह देशातील राजकीय वर्तुळात नवा संदेश गेला आहे. एनडीएसोबतची युती चूक होती, हे जाहीरपणे मान्य करत त्यांनी आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. संधी मिळताच सत्ताधाऱ्यांना गडबडून टाकण्याची त्यांची तयारी सुस्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या या भूमिकेमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाची वाटचाल नक्कीच लक्षवेधी ठरेल, हे निश्चित.