- Home
- Maharashtra
- MahaDBT Alert : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना! 9 जानेवारीपर्यंत ‘हे’ न केल्यास मंजूर अर्ज थेट रद्द होणार
MahaDBT Alert : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना! 9 जानेवारीपर्यंत ‘हे’ न केल्यास मंजूर अर्ज थेट रद्द होणार
MahaDBT Farmer Scheme Application Status : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर प्रलंबित अर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून पूर्व संमती मिळवण्यासाठी ९ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना!
मुंबई : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलसंदर्भात राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी महाडीबीटी पोर्टलवर पूर्व संमती (Pre-Approval) पर्याय बंद करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, आता शासनाने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे, त्यांचे अर्ज पूर्व संमतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना शुक्रवार, 9 जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
प्रलंबित अर्जांसाठी शासनाची शेवटची संधी
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर गेल्या सहा महिन्यांत सोडतीत निवड झालेल्या अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अर्ज अद्यापही शेतकरी स्तरावर प्रलंबित असून, आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड झालेली नाहीत. ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने शेवटची आणि अंतिम संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
9 जानेवारीनंतर कोणतीही मुदतवाढ नाही
प्रशासनाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, 9 जानेवारीनंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड न केल्यास संबंधित अर्ज आपोआप (Auto Delete) रद्द केले जाणार आहेत. त्यामुळे अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल, तर शेतकऱ्यांनी दिलेल्या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अर्ज कायमस्वरूपी रद्द होतील आणि त्यांचा पुढील विचार केला जाणार नाही.
वेळेत पूर्व संमती मिळालेल्या अर्जांना दिलासा
महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी वेळेत कागदपत्रे अपलोड करून पूर्व संमती प्राप्त केली आहे, त्यांचे अर्ज नंतर कोणत्याही कारणास्तव रद्द केले जाणार नाहीत, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अंतिम तारखेची वाट न पाहता तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कागदपत्रांच्या नियमांमध्ये सुलभता
अनुदान योजनांसाठी कागदपत्रांच्या बाबतीत काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना आता
सातबारा उतारा
आठ-अ उतारा
गाव-शिवाराचा पत्ता
आधार क्रमांक
बँक खाते क्रमांक
ही कागदपत्रे स्वतंत्रपणे सादर करण्याची आवश्यकता नाही.
मात्र, यांत्रिकीकरणाशी संबंधित योजनांसाठी दरपत्रक (कोटेशन) देणे बंधनकारक असून, फलोत्पादन योजनांसाठी प्राकलन (इस्टिमेट) सादर करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतरच शेतकऱ्यांना पूर्वसंमतिपत्र देण्यात येणार आहे.
निष्काळजीपणा ठरू शकतो महागात
जर एखाद्या शेतकऱ्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नाही, तर अशा अर्जांवर संगणकीय प्रणालीद्वारे सात दिवसांनंतर स्वयंचलित कारवाई केली जाईल आणि अर्ज रद्द केले जातील. तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव किंवा दुर्लक्ष यामुळे अनुदानाचा लाभ गमावण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.

