लाडकी बहिण योजना बंद होणार किंवा थांबणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. याबद्दलच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सुरू असलेल्या चर्चांबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. सदर योजना बंद होणार किंवा निधीअभावी लाभ थांबणार असल्याच्या चर्चांंना मंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्णविराम दिला आहे. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा
मंत्री जयकुमार गोरे हे धाराशिव दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना गोरे म्हणाले की, "सरकारच्या तिजोरीवर लाडक्या बहिणींचा आणि शेतकरी कर्जमाफीचा आर्थिक भार आहे. तरीही राज्य सरकार या योजनेसाठी सक्षम आहे. राज्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. कोणत्याही विकासकामांच्या निधीत कपात केली जाणार नाही. सर्व बाबींचा विचार करूनच सरकारने हे निर्णय घेतले आहेत."
ई-केवायसीसाठी पुन्हा संधी
ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे अनेक महिलांना योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळू शकला नव्हता. अशा लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांची ई-केवायसी अपूर्ण आहे त्यांना पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रलंबित लाभार्थीं महिलांनाही योजनेचा लाभ मिळू शकतो.
काय म्हणाल्या आदिती तटकरे?
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेतील मासिक लाभ 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत विचारले असता आदिती तटकरे म्हणाल्या की, "लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली जात आहे. लाभाची रक्कम 2,100 रुपये करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील." यामुळे हप्ता वाढीबाबत अद्याप अंतिम निर्णय सरकारकडून झालेला नाही. मात्र सकारात्मक संकेत मिळत असल्याचे मानले जात आहे.


