Pune : पुण्यातील केतन अग्रवाल याच्या मृत्यूप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या तपासात काही धक्कादायक खुलासे झाले असून सिया आणि तिच्या मित्राने केतनचा काटा काढला. 

Pune : पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. सुरुवातीला लोहगडावरुन पाय घसरुन खाली पडल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. याशिवाय लग्नाआधी होणाऱ्या बायकोसोबत केतनने बाली ट्रिपसाठी प्लॅन केलो होता पण तो फसला गेला. खरंतर, विमानतळावर पोहोचल्यानंतर अचानक पासपोर्ट नसल्याची बाब ही योगायोग नसून हत्येचा कटाची सुरुवात होती असा पोलिसांचा संशय आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

बाली ट्रिपपूर्वीच गायब झाला पासपोर्ट

फेब्रुवारी महिन्यात सिया गोयल आणि केतनचा साखरपुडा झाला होता. 6 जूनला बालीला दोघे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी जाणार होतो. पण मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर केतनाचा पासपोर्ट गायब झाल्याची बाब समोर आली. यामुळे प्रवास रद्द करावा लागला. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितले की, सर्वांचे पासपोर्ट आणि काही कागदपत्रे एका पाउचमध्ये होती. पण विमानतळावर आल्यानंतर केवळ केतनचाच पासपोर्ट नसल्याचे लक्षात आले.

पासपोर्ट फाडून टाकल्याचा पोलिसांचा दावा

तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. सिया गोयलनेच केतन यांचा पासपोर्ट चोरून तो फाडल्याचा संशय आहे. याशिवाय विमानतळावर जाण्यापूर्वी एका हॉटेलच्या वॉशरूममध्ये टाकून दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार पूर्वनियोजित कटाचा भाग होता.

खुनाचा कट अनेक आठवड्यांपासून सुरू

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे केतन या दोघांमधील अडथळा ठरला होता. 14 जूनला लोहगडावर गेलेल्या केतनला साप दिसल्याचा बहाणा करत दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. पण केतन यावेळी बचावला. पुन्हा 18 जूनला लोहगडावर सिया आणि चेतन यांनी प्लॅन करत केतन यांना खोल दरीत ढकल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे.

प्रकरणात दररोज नवे खुलासे

सुरुवातीला पोलिसांनी हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले होते. ट्रेकिंगदरम्यान फोटो काढताना जोरदार वाऱ्यामुळे केतन सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात आले होते. पण तपासादरम्यान अनेक गोष्टींमध्ये पारदर्शकता नसल्याचे समोर आले. यानंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.

सियाच्या वर्तनामुळे कुटुंबाला संशय

विशाल अग्रवाल यांनी म्हटले की, सुरुवातीला केतनचा अपघाती मृत्यू असल्याचे वाटले. पण सियाच्या वागवणूकीमुळे तिला केतनला गमावल्याचे अजिबात दु:ख दिसत नव्हते. यामुळे अग्रवाल कुटुंबियाच्या मनात सिया विरोधात संशयाची पाल चुकचुकत होती.

लग्नासाठी कोट्यावधींचा खर्च

केतनच्या लग्नासाठी घरातील मंडळींनी जंगी तयारी केली होती. यासाठी जयपूरला आलिशान पॅलेस बूक केला होता. यासाठी कोट्यावधींचा खर्च देखील करण्यात येणार होता. विशेष म्हणजे, पाहुण्यांसाठी चार्डेट विमानाची देखील सोय करण्यात आली होती.