राज्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने अनेक भागांत येलो अलर्ट जारी केला असून, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात मान्सून अद्याप अधिकृतपणे दाखल झाला नसला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वातावरणात मोठा बदल जाणवला. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पावसाच्या सरी कोसळल्या? 

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, नांदेड आणि जळगावसह अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा घटनाही घडल्याची माहिती समोर आली आहे.

येलो अलर्ट जारी केला 

हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः घाटमाथा, डोंगराळ भाग आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी कृषी तज्ज्ञांनी अद्याप पेरणीची घाई करू नये, असा सल्ला दिला आहे. सध्या सुरू असलेला पाऊस हा मान्सूनपूर्व स्वरूपाचा असल्याने सातत्यपूर्ण पावसाची प्रतीक्षा करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. अचानक पाऊस थांबल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई आणि आसपासच्या काही भागांमध्ये मात्र अपेक्षेप्रमाणे जोरदार पाऊस झालेला नाही. वातावरणात दमटपणा कायम असून उष्णतेचा त्रासही जाणवत आहे. हवामानातील बदल आणि समुद्रावरील वाऱ्यांच्या स्थितीमुळे मुंबईत पावसाच्या आगमनाला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यात यंदा मान्सूनचा प्रवास आणि पावसाचे प्रमाण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदाचा मान्सून काही भागांत सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी, प्रशासन आणि जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.