- Home
- Maharashtra
- कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ! दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस आता सुटणार 'दिवा' स्थानकातून; रेल्वेच्या निर्णयाने प्रवाशांचा संताप
कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ! दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस आता सुटणार 'दिवा' स्थानकातून; रेल्वेच्या निर्णयाने प्रवाशांचा संताप
Dadar-Ratnagiri Express shifted to Diva: रेल्वे प्रशासनाने परिचालन अडचणींमुळे दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस दादरऐवजी दिवा स्थानकातून चालवण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार असून कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली.

कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ! दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस आता सुटणार 'दिवा' स्थानकातून
मुंबई: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक अत्यंत निराशाजनक बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने परिचालन अडचणींचे (Operational Issues) कारण देत दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस आता दादरऐवजी दिवा स्थानकातून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईतून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होणार असून, रेल्वेच्या या 'विचित्र' निर्णयामुळे कोकणवासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं कारण काय?
मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, दादरहून सुटणाऱ्या या गाडीमुळे उपनगरीय लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. कोकणातून येणारी ही गाडी दिवा स्थानकात मुख्य मार्गावर आणताना लोकल गाड्या थांबवाव्या लागतात. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी आता या गाडीचा प्रवास दादरऐजी थेट दिव्यावरूनच सुरू होणार आहे.
उत्तर भारतीय गाड्यांना झुकते माप?
एकीकडे कोकण रेल्वेच्या गाड्या मुंबईबाहेर ढकलल्या जात असताना, दुसरीकडे दादर-गोरखपूर विशेष एक्स्प्रेस कायमस्वरूपी चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. "उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना प्राधान्य आणि कोकणी माणसाच्या सोयीकडे दुर्लक्ष का?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सुरेश प्रभू यांची आक्रमक भूमिका
माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही या निर्णयावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "ही चूक तातडीने दुरुस्त करा," अशी मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची आधीच मेल-एक्स्प्रेस गाड्यांची संख्या कमी असल्याने मोठी गैरसोय होत आहे, त्यात या निर्णयामुळे प्रवाशांना आता दादर सोडून दिव्याला जावे लागणार आहे.
प्रवाशांच्या अडचणीत भर
अतिरिक्त प्रवास: दादर किंवा मुंबईच्या मध्यवर्ती भागातून प्रवाशांना आता सामानासह दिव्यापर्यंत लोकलने प्रवास करावा लागेल.
विस्कळीत नियोजन: अचानक झालेल्या या बदलामुळे प्रवाशांचे आधीच केलेले आरक्षणाचे नियोजन कोलमडले आहे.
दुजाभाव: कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या थांब्यांमध्ये होत असलेल्या कपातीमुळे रेल्वेवर प्रवाशांचा विश्वास कमी होत आहे.
रेल्वे प्रशासन आपला हा निर्णय मागे घेणार की प्रवाशांना असाच त्रास सहन करावा लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

