मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच मुंबईत मराठी पत्रकार संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांना फिनिक्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

मुंबई : मराठी पत्रकार संघातर्फे मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना फडणवीस यांनी आपल्या राजकीय प्रवासातील संघर्ष व सकारात्मकतेबद्दल खुलेपणाने विचार मांडले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

 “राख होईल असं वाटलं, पण भरारी घेतली”

फिनिक्स पुरस्काराविषयी प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “तुम्ही मला फिनिक्स पुरस्कार दिला म्हणजे मी राखेतून उभा राहिलो, असा अर्थ नाही. अनेकदा लोकांना वाटलं माझी राख होतेय, पण तेवढ्यात मी भरारी घेतली आहे.” त्यांनी स्पष्ट केले की हे यश त्यांना मिळाले कारण त्यांनी आव्हानांपासून कधीही पळ काढला नाही, उलट त्यांचा सकारात्मकतेने सामना केला.

Scroll to load tweet…

संयम आणि सकारात्मकतेचा मंत्र

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोन गोष्टींमुळेच ते आज या स्थानापर्यंत पोहोचले. “माणसांचा कधी द्वेष केला नाही, टोकाचं राजकारण केलं नाही. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीत काहीतरी चांगलं पाहण्याचा नेहमी प्रयत्न केला,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विचारांना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.

मराठा आरक्षण आंदोलनाचा यशस्वी निकाल

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठे आंदोलन झाले होते. हजारो आंदोलकांनी ठाण मांडल्याने राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं. मात्र, फडणवीस यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून संवाद साधत हा प्रश्न यशस्वीरित्या सोडवला. आंदोलकांनी माघार घेतली आणि या घडामोडी फडणवीस यांच्या नेतृत्वासाठी मोठं यश मानल्या गेल्या.

‘देवाभाऊ’ जाहिरात मोहीम

या यशानंतर दोन दिवसांपूर्वी राज्यातील प्रमुख मराठी, हिंदी आणि इंग्रजी दैनिकांमध्ये तसेच सोशल मीडियावर ‘देवाभाऊ’ या नावाने जाहिराती प्रसिद्ध झाल्या. या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे राजकीय वर्तुळात यावर चांगलीच चर्चा रंगली आहे.