परळी तालुक्यातील लिंबोटा गावात १८ वर्षीय युवकावर २० जणांच्या टोळीने अमानुष हल्ला केला. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली आहे.

परळी: परळी तालुक्यातील लिंबोटा गावातील १८ वर्षीय युवक शिवराज दिवटे याच्यावर १६ मे रोजी झालेल्या अमानुष हल्ल्याने संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

शिवराज दिवटे हा युवक जलालपूर येथील धार्मिक कार्यक्रमातून परतत असताना, २० जणांच्या टोळीने त्याचे अपहरण करून रत्नेश्वर मंदिर परिसरात नेले आणि लाठ्याकाठ्यांनी त्याच्यावर अमानुष हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हल्लेखोर "याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा" असे म्हणताना दिसतात. या विधानामुळे डिसेंबर २०२४ मध्ये मासाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची आठवण झाली आहे. 

या घटनेनंतर पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. परळी पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा प्रयत्न, दंगल घडवणे, अपहरण आणि बेकायदेशीर जमाव जमवणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कनवत यांनी सांगितले की, या प्रकरणात कोणताही जातीय किंवा धार्मिक वाद नाही, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी बीड पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून, आवश्यक असल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्यासही सांगितले आहे.