राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अंतर्गत मतभेद उघड झाले असून, आमदार इद्रीस नायकवडी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, नायकवडी यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून कोणतीही सूचना नसल्याचे सांगत राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या घडामोडीमुळे पक्षातील अंतर्गत चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पक्षातील काही घडामोडींमुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात असतानाच आता आणखी एका मोठ्या राजकीय घडामोडीची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भातील पत्रामुळे पक्षात नाराजीचे सूर उमटले होते. या पत्रात काही महत्त्वाच्या नेत्यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने नाराजी निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यानंतर काही वरिष्ठ नेत्यांनी थेट शरद पवार यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली होती.

राजीनामा देणार नाही
या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेतृत्वाकडून आमदार इद्रीस नायकवडी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी वरिष्ठ स्तरावरून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र इद्रीस नायकवडी यांनी या मागणीला स्पष्ट नकार दिला आहे. आपल्याला पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आपण राजीनामा देणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मागणी का केली जातेय
इद्रीस नायकवडी हे राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेत गेलेले आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी का करण्यात आली, याबाबत विविध राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी बैठकीत या विषयावर अधिक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातील वाढत्या अंतर्गत चर्चांमुळे आगामी काळात अजित पवार गटात आणखी काही मोठे निर्णय होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
