पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी?
पावसाळा म्हणजे हिरवाई, गारवा आणि वातावरणातील सुखद बदल. मात्र, याच ऋतूमध्ये अनेक प्रकारचे आजारही वाढतात. सर्दी, खोकला, ताप, मळमळ, डायरिया, त्वचेचे रोग अशा अनेक समस्यांनी पावसाळ्यात घेरलं जातं.तर शरीरातीची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी हे जाणून घेऊ.

योग्य आहार घ्या
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पावसाळ्यात हंगामी फळे जसे की जांभूळ, पेरू, सीताफळ, आवळा यांचा समावेश करावा. आवळा आणि लिंबूमध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते, जे इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.हिरव्या पालेभाज्या उकडून किंवा वाफवून खाव्यात, कारण पावसाळ्यात यामध्ये माती व जीवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. लसूण, आलं, हळद, तुळस, काळी मिरी यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला आजारांशी लढण्याची ताकद मिळते.
उकळलेले आणि स्वच्छ पाणी प्या
पावसाळ्यात पाण्यामुळे होणारे रोग मोठ्या प्रमाणात पसरतात. त्यामुळे उकळलेले, फिल्टर केलेले पाणीच पिणे आवश्यक आहे. शक्य असल्यास हर्बल पाणी (उदा. तुळस, आलं, लवंग टाकून उकळलेले) प्या. हे पाणी शरीरात साचलेले टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतं.
झोप आणि व्यायामावर भर द्या
रात्रीची सात ते आठ तासांची झोप आणि नियमित व्यायाम हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास अत्यंत आवश्यक आहेत. योगासने, प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम यांचा पावसाळ्यात नियमित सराव केल्यास शरीर तंदुरुस्त राहते आणि इम्युन सिस्टम मजबूत होते.
हायजिन राखा
शरीराची स्वच्छता, कपड्यांची स्वच्छता आणि अन्नपदार्थांच्या स्वच्छतेकडे पावसाळ्यात अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. बाष्पयुक्त हवामानामुळे बुरशीसारखे संसर्ग लवकर होतात. त्यामुळे अंघोळीनंतर कोरडे कपडे घालावेत आणि शक्य असल्यास अँटीसेप्टिक लिक्विड वापरून आंघोळ करावी.
घरगुती उपायांचा वापर करा
हळदीचे दूध, तुळशी-आल्याचा काढा, लवंग व मिरीचा गरम पाण्यातला अर्क असे घरगुती उपाय पावसाळ्यात खूप उपयोगी ठरतात. हे नैसर्गिक उपाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि सर्दी-खोकल्यासारख्या त्रासांपासून संरक्षण करतात.

