तुमच्या घरात झुरळं आणि मुंग्यांनी धुमाकूळ घातलाय का? काळजी करू नका, तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील काही सोप्या वस्तू वापरून त्यांना सहज पळवून लावू शकता.

फरशीवर अन्नाचे थोडे जरी कण पडले की लगेच लाल मुंग्या, माश्या आणि झुरळांची जणू पार्टीच सुरू होते. हे दिसायला तर त्रासदायक असतंच, पण यामुळे आजार पसरण्याचा धोकाही असतो.

झुरळं आणि मुंग्यांपासून सुटका मिळवण्याचे मार्ग

तुम्हीही याच समस्येने त्रस्त आहात का? बाजारातील केमिकल स्प्रे वापरण्याऐवजी, तुम्ही आपल्या स्वयंपाकघरातील काही सोप्या वस्तू वापरून ही समस्या सोडवू शकता. फक्त फरशी पुसण्याच्या पाण्यात या गोष्टी मिसळा, त्यांच्या वासानेच हे किटक घरात फिरकणार नाहीत.

१. व्हाईट व्हिनेगर

एका बादली पाण्यात साधारण अर्धा कप व्हाईट व्हिनेगर टाकून चांगलं मिक्स करा. मग या पाण्याने संपूर्ण घर पुसून घ्या. मुंग्या आणि इतर किटकांना व्हिनेगरचा वास अजिबात सहन होत नाही. इतकंच नाही, तर यामुळे फरशीवरचे चिकट डागही निघतात आणि तुमच्या टाईल्स चमकू लागतात.

२. लिंबाचा रस

तुमच्याकडे व्हिनेगर नसेल, तर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. एका बादली पाण्यात २ ते ३ चमचे लिंबाचा रस मिसळा आणि त्याने घर पुसून घ्या. लिंबामधील सायट्रिक ऍसिडमुळे फरशीवरचे जंतू मरतात. त्याच्या आंबट वासाने माश्या आणि इतर किटक दूर पळतात आणि घरात एक फ्रेश सुगंध दरवळतो.

३. कडुलिंबाचे पाणी

कडुलिंब हे एक नैसर्गिक जंतुनाशक आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. कडुलिंबाची काही पानं पाण्यात टाकून ते चांगलं उकळवा. पाणी थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि नेहमीच्या फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळा. या पाण्याने फरशी पुसल्यास कोणत्याही केमिकलशिवाय तुमची फरशी स्वच्छ होईल. झुरळं आणि मुंग्यांसारखे किटक जवळही येणार नाहीत.

४. मीठ

हा एक खूप जुना आणि सोपा घरगुती उपाय आहे. दोन चमचे मीठ थोड्या कोमट पाण्यात विरघळवून घ्या. या पाण्याने घर पुसल्यास मुंग्यांची रांग लगेच नाहीशी होते. वास्तुशास्त्रानुसार, मिठाच्या पाण्याने घर पुसल्यास घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते, अशीही एक मान्यता आहे.

५. बेकिंग सोडा आणि लिक्विड सोप

तुमच्या किचन किंवा डायनिंग हॉलची फरशी तेलकट आणि चिकट झाली असेल, तर थोडा बेकिंग सोडा आणि काही थेंब लिक्विड सोप कोमट पाण्यात मिसळून त्याने फरशी स्वच्छ करा. यामुळे अन्नाच्या कणांमुळे येणारा वास दूर होतो आणि झुरळं येण्यापासून बचाव होतो. घरात लहान मुलं असतील, तर केमिकल वापरण्याऐवजी असे नैसर्गिक उपाय वापरणं त्यांच्या आरोग्यासाठी जास्त सुरक्षित आहे. चला तर मग, आजच हे उपाय करून बघा!