अनेकदा तोंडाला वास येत असल्यामुळे चारचौघात बोलायची लाज वाटते. यामुळे आत्मविश्वासही कमी होतो. तुमच्यासोबतही असं होत असेल, तर त्यावर एक सोपा घरगुती उपाय आहे.
तोंडाच्या दुर्गंधीमुळे अनेकजण हैराण असतात आणि ही एक लाजिरवाणी समस्या आहे. अनेकजण यावर उपाय म्हणून च्युइंग गम, माऊथ फ्रेशनर किंवा माऊथवॉश वापरतात. पण हे उपाय फक्त काही काळापुरतेच काम करतात. जर तुम्हाला या समस्येपासून कायमची सुटका हवी असेल, तर हा घरगुती उपाय नक्की करून बघा.
तोंडाला दुर्गंधी का येते?
तोंडाला वास येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तोंडात वाढणारे बॅक्टेरिया. दातांमध्ये अडकलेलं अन्न आणि जिभेवर साचलेल्या घाणीमुळे हे बॅक्टेरिया वाढतात. यामुळेच तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.
काय करायला हवं?
तुमच्या तोंडाला वास येत असेल, तर तुम्ही घरातल्या मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून ही समस्या दूर करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त लवंग आणि दालचिनीची गरज आहे.
सगळ्यात आधी ४ ते ५ लवंगा घेऊन त्यांची पूड करा आणि ती साधारण २५० मिली पाण्यात टाका. याच पाण्यात १ इंच दालचिनीचा तुकडाही टाका. आता हे पाणी मध्यम आचेवर सुमारे ५ मिनिटं चांगलं उकळू द्या. ठरलेल्या वेळेनंतर गॅस बंद करा आणि भांड्यावर झाकण ठेवा. पाणी कोमट झाल्यावर ते गाळून घ्या आणि या पाण्याने गुळण्या करा.
गुळण्या करण्याची योग्य पद्धत
तयार केलेल्या पाण्यापैकी एक घोट तोंडात घ्या आणि सुमारे ३० ते ४० सेकंद तोंडातल्या तोंडात फिरवून चांगली चूळ भरा. यानंतर, पाणी थोडं घशाच्या दिशेने न्या आणि सुमारे २० सेकंद गुळण्या करा. त्यानंतर पाणी थुंकून टाका. सकाळी दात घासल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही नियमितपणे असं केलं पाहिजे.
लवंग आणि दालचिनीचं पाणी फायदेशीर का आहे?
लवंगामध्ये 'युजेनॉल' (eugenol) नावाचं एक कंपाऊंड असतं, ज्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. तर दालचिनीमध्ये 'सिनामल्डिहाइड' (cinnamaldehyde) नावाचा घटक असतो, जो बॅक्टेरियाला मारण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. गुळण्या करण्यासोबतच जीभही रोज स्वच्छ करणं गरजेचं आहे. तसंच, दिवसभर पुरेसं पाणी प्या, कारण तोंड कोरडं पडल्यासही दुर्गंधी येते.


