नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या महापुरात ईशा फाऊंडेशनचे सुमारे ८० सदस्य बेपत्ता झाले आहेत. या घटनेनंतर सद्गुरू जग्गी वासुदेव अनुयायांशी बोलताना भावुक झाले. ज्यावेळी पूर आला, तेव्हा हे सर्वजण ग्यिरोंग येथील इमिग्रेशन सेंटरमध्ये होते आणि ही संपूर्ण इमारतच पुरात वाहून गेली. बचावकार्यात सहभागी होण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सद्गुरूंनी केली आहे.
तिबेटमधील तिबेट ईशा फाऊंडेशनच्या शिबिरात सध्या दुःखाचं वातावरण आहे. नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या महापुरात ईशा फाऊंडेशनचे कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले अनेक सदस्य बेपत्ता झाले आहेत. याबद्दल बोलताना आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांना अश्रू अनावर झाले.
सध्या सागामध्ये असलेल्या सद्गुरूंनी तिबेटमधील ग्यिरोंग येथे जाऊन शोध आणि बचाव कार्यात सहभागी होण्याची परवानगी मिळावी, अशी भावनिक साद घातली आहे. त्यांनी सांगितलं की, जेव्हा पूर आला, तेव्हा यात्रेकरूंचा गट इमिग्रेशनच्या इमारतीत होता आणि काही क्षणांतच ही इमारत वाहून गेली.
पूर आला तेव्हा गट इमिग्रेशन सेंटरमध्ये होता
सद्गुरूंनी सांगितलं की, कैलास यात्रेतून परतणारा हा गट आपत्ती येण्यापूर्वी काही वेळ आधीच ग्यिरोंगमधील इमिग्रेशन सेंटरला पोहोचला होता.
त्यांच्या माहितीनुसार, ग्रुप लीडर ईशांग प्रवीण यांनी सकाळी ९.०५ च्या सुमारास गट सेंटरला पोहोचल्याचा मेसेज पाठवला होता. पण त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत, म्हणजे ९.१४ वाजता, पाणी आणि मातीच्या ढिगाऱ्याचा प्रचंड लोंढा आला आणि सगळं वाहून गेलं.
सुरुवातीला ईशा फाऊंडेशनचे ७७ यात्रेकरू आणि तीन स्वयंसेवक बेपत्ता झाल्याचं सांगण्यात आलं. ताज्या माहितीनुसार, अजूनही सुमारे ८० सदस्य बेपत्ता आहेत, मात्र आकड्यांमध्ये थोडा बदल होत आहे.
सद्गुरूंनी घातली भावनिक साद
या घटनेने सद्गुरू स्वतः खूप व्यथित झाले आहेत. कारण फक्त आठवडाभरापूर्वी ते स्वतः त्याच इमिग्रेशन सेंटरमध्ये होते, असं त्यांनी सांगितलं.
बेपत्ता झालेल्या गटाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही आणि आपत्तीग्रस्त भागातील संपर्क पूर्णपणे तुटला आहे, असंही ते म्हणाले.
सद्गुरूंनी सांगितलं की त्यांनी ग्यिरोंगला पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण रस्ते आणि इतर मार्ग आपत्तीमुळे बंद झाले आहेत. त्यांनी भारत आणि चीनच्या अधिकाऱ्यांकडे एका लहान टीमसह प्रभावित भागात प्रवेश करण्याची आणि शोध कार्यात मदत करण्याची परवानगी मागितली आहे.
मृतांचा आकडा वाढतोय, शेकडो लोक बेपत्ता
गुरुवारी मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, नेपाळ-तिबेटमधील या मोठ्या आपत्तीत किमान २७० लोकांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकांना मृतदेह सापडत असल्याने हा आकडा बदलण्याची शक्यता आहे. नेपाळ आणि तिबेटमध्ये मिळून १३०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.
बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हिमालयाचा भाग कोसळल्याने पूर
अधिकारी आणि शास्त्रज्ञ या आपत्तीची चौकशी करत आहेत. हिमालयातील बर्फ, चिखल आणि खडक यांचा मोठा भाग कोसळल्यामुळे हा प्रलय आल्याचं मानलं जात आहे. या महाकाय लोंढ्याने नेपाळ-चीन सीमेजवळील खोऱ्यांमधील गावं आणि वस्त्या उद्ध्वस्त केल्या.
घरं, रस्ते, पूल आणि सीमेवरील पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत, तर अनेक भागांतील संपर्क यंत्रणा ठप्प झाली आहे. कैलास यात्रेच्या मार्गावर प्रवास करणारे भारतीय आणि इतर परदेशी पर्यटक अजूनही बेपत्ता आहेत.
इमिग्रेशन सेंटर पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचा एक व्हायरल व्हिडिओ समोर आल्याने या घटनेची भीषणता आणखी वाढली आहे. शोधकार्य सुरू असताना, बेपत्ता झालेल्या ईशा फाऊंडेशनच्या यात्रेकरूंचं काय झालं, हे अद्याप अस्पष्ट आहे.
बचाव कार्याला वेग
नेपाळ लष्कर, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलासह सर्व सरकारी यंत्रणा एकत्र येऊन तिबेट-नेपाळ सीमेवर आलेल्या महापुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहेत, अशी माहिती कोलकाता येथील नेपाळचे उप वाणिज्य दूत दीपेश लेखक यांनी गुरुवारी दिली.
एएनआयशी बोलताना लेखक म्हणाले की, बचाव कार्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून, हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांना गंभीर भागातून बाहेर काढलं जात आहे.
“सध्या हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत २३९ लोकांना हेलिकॉप्टरने वाचवण्यात यश आलं आहे आणि हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे,” असं ते म्हणाले.
६४४ प्रवासी बेपत्ता असल्याची नोंद
लेखक यांनी सांगितलं की, नेपाळ टुरिझम बोर्ड पुरानंतर बेपत्ता झालेल्या पर्यटकांची माहिती गोळा करत आहे. तिबेट सीमेवरील चिनी इमिग्रेशन पॉईंट्सवरूनही माहिती तपासली जात आहे, कारण पश्चिम बंगाल आणि कोलकाता येथील लोकांसह अनेक पर्यटक या भागात होते.
ट्रेकिंग आणि ट्रॅव्हल कंपन्यांकडून नेपाळ टुरिझम बोर्डाला मिळालेल्या प्राथमिक नोंदीनुसार, १२७ नेपाळी नागरिकांसह ६४४ प्रवासी प्रभावित भागातून बेपत्ता आहेत. त्यांची माहिती ट्रॅव्हल एजन्सी, गाईड, स्थानिक अधिकारी आणि सुरक्षा एजन्सींकडून तपासली जात आहे.
इतर अनेक देशांतील लोकही बेपत्ता झालेल्यांमध्ये आहेत. प्राथमिक आकडेवारीनुसार, यात ५३ युक्रेनियन, ३५ ऑस्ट्रेलियन आणि २५ कॅनेडियन नागरिकांचा समावेश आहे.
नेपाळ दूतावासाच्या सूत्रांनी सांगितलं की, आतापर्यंत सुमारे २७० मृतदेह सापडले आहेत, तर अनेक स्थानिक आणि पर्यटक अजूनही बेपत्ता आहेत. दुसऱ्या एका अहवालानुसार, २८ देशांतील ४७६ लोक बेपत्ता असल्याची नोंद आहे. अधिकारी म्हणाले की, शोध आणि बचावकार्य सुरू असल्याने या आकड्यांची पडताळणी केली जात आहे.
जयशंकर यांनी घेतला भारताच्या तयारीचा आढावा
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि काठमांडू व बीजिंगमधील भारतीय राजदूतांसोबत एक आढावा बैठक घेतली.
जयशंकर म्हणाले की, पूरग्रस्त भागातील भारतीयांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रयत्न सुरू आहेत.
परराष्ट्र मंत्रालय विविध मंत्रालये, राज्य सरकारे, टूर ऑपरेटर आणि प्रकल्प अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे. तसेच, भारतीयांच्या मदतीसाठी आणि व्यापक मदत कार्यासाठी नेपाळसोबत मिळून काम करत आहे.
भारताचं सीमावर्ती भागांवर लक्ष
नेपाळमधील पुरानंतर भारतानेही आपल्या सीमावर्ती भागांवर लक्ष ठेवलं आहे.
एनडीआरएफचे महानिरीक्षक नरेंद्र सिंह बुंदेला यांनी सांगितलं की, आतापर्यंत भारतीय सीमावर्ती भागात पुराचा कोणताही वाईट परिणाम झालेला नाही. तथापि, कुशीनगर आणि पश्चिम चंपारणसारख्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या पातळीवर यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे.
बुंदेला म्हणाले की, राज्य सरकारे आणि केंद्रीय जल आयोग सतत लक्ष ठेवून आहेत, तर जमिनीवरील तयारी आणि जनजागृती आधीच पूर्ण झाली आहे.
रस्ते आणि पुलांचं मोठं नुकसान
पुरामुळे या प्रदेशातील रस्ते आणि पुलांचं मोठं नुकसान झालं आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी पोहोचणं कठीण झालं आहे. नेपाळची सुरक्षा दलं हेलिकॉप्टर आणि जमिनीवरील पथकांच्या मदतीने बचाव आणि मदतकार्य तीव्र करत आहेत.
आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना वैद्यकीय मदत, तात्पुरता निवारा, अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधं पुरवली जात आहेत.
नेपाळमधील भारतीय दूतावासाने मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत: +९७७ ९८५ १३१ ६८०७, +९७७ ९७० ९१० ७५०० आणि +९७७ ९८१ ०३२ ६११७. हे क्रमांक व्हॉट्सॲपवरही उपलब्ध आहेत.
(एएनआयच्या इनपुटसह)


