Professor Assaulted: बंगळूरुजवळच्या नेलमंगला येथील सिद्धार्थ मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रोफेसरने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या मालकीच्या कॉलेजमधील या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बंगळूरु: नेलमंगला तालुक्यातील टी. बेगूर गावात असलेल्या सिद्धार्थ मेडिकल कॉलेजमध्ये एका घटनेमुळे मोठा राडा झाला असून, कॅम्पसमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, हे कॉलेज कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या मालकीचं असल्यामुळे या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजमधील अब्दुल नावाच्या प्रोफेसरवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीसोबत त्याने असभ्य वर्तन करत तिला प्रपोज केलं. इतकंच नाही, तर चॉकलेट देऊन आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, असंही म्हटलं जात आहे. प्रोफेसरच्या या वागण्यामुळे विद्यार्थिनी प्रचंड संतापली आणि तिने त्याला नकार दिला. यानंतर वर्गातच दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि प्रकरण चांगलंच तापलं.
विद्यार्थ्यांचा संताप अनावर
ही घटना कळताच इतर विद्यार्थीही संतापले. 'स्त्रियांना सन्मान नाही का?' असा जाब विचारत त्यांनी आरोपी प्रोफेसरविरोधात आपला राग व्यक्त केला. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि काही विद्यार्थ्यांनी प्रोफेसर अब्दुलला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
संतापलेल्या विद्यार्थिनीनेही प्रोफेसरला चपलेने मारहाण केल्याची माहिती आहे. काही विद्यार्थ्यांनी तर त्याला लाथा-बुक्क्यांनी मारत संपूर्ण कॅम्पसमधून पळवून पळवून मारलं. इतकंच नाही, तर त्याच्या कारपर्यंत त्याचा पाठलाग करून पुन्हा मारहाण करण्यात आली.
प्रोफेसरने काढला पळ
विद्यार्थ्यांच्या मारहाणीत जखमी झालेला प्रोफेसर अब्दुल, प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं पाहून तिथून पळून गेल्याची माहिती आहे. या घटनेनंतर कॉलेज परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण होतं.
पोलिसांची कारवाई
हे प्रकरण नेलमंगला ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलं असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करून पुढील कारवाई करतील.
राज्यभर चर्चेला उधाण
स्वतः गृहमंत्र्यांच्या मालकीच्या कॉलेजमध्ये अशी घटना घडल्याने राज्यपातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिक्षण संस्थांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा, नैतिकता आणि शिक्षकांच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून, शिक्षण संस्थांमध्ये महिलांचा सन्मान आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.


