PM Modi Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दिल्लीतील सेवा तीर्थ येथे केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, तेलाच्या किमती, महागाई आणि पुरवठा साखळी यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

PM Modi Meeting : देशातील राजकीय आणि आर्थिक घडामोडींना वेग आला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. सेवा तीर्थ येथे दुपारी ४ वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी सर्व केंद्रीय मंत्री, स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आर्थिक सुरक्षेचा आढावा घेण्यासोबतच सरकारमधील आगामी फेरबदलांवरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पश्चिम आशियातील तणावावर केंद्र सरकारची नजर

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम तेलाच्या किमती, इंधन पुरवठा आणि महागाईवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत ऊर्जा सुरक्षा, इंधन साठा आणि आर्थिक परिणामांचा सविस्तर आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय गट

संकट परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यासाठी सरकारने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचा एक उच्चस्तरीय अनौपचारिक गट स्थापन केला आहे. या गटात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचाही समावेश आहे. या गटाचे उद्दिष्ट भारताच्या ऊर्जा आणि आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना सुचवणे हे आहे.

‘देशात इंधनाचा पुरेसा साठा’

राजनाथ सिंह यांनी अलीकडेच परिस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना देशात कच्चे तेल, ऊर्जा आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले होते. “सरकार २४ तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोणतीही मोठी अडचण निर्माण होणार नाही,” असे त्यांनी म्हटले होते. तरीही जागतिक परिस्थिती लक्षात घेता सरकार कोणतीही जोखीम पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मोदी 3.0 च्या वर्धापनदिनाआधी राजकीय हालचाली

१० जून रोजी मोदी 3.0 सरकारचा पहिला वर्धापनदिन पूर्ण होत आहे. त्याआधीच दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलांच्या चर्चा जोर धरत असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात काही मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंत्रालयांच्या कामकाजाचाही आढावा

सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार विविध मंत्रालयांच्या कार्यपद्धतीचा आणि संघटनात्मक रचनेचाही आढावा घेत आहे. काही मंत्रालयांमध्ये कामगिरीच्या आधारे बदल होऊ शकतात, तर काही नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.