Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वेने मुंबई ते बंगळुरू दरम्यान दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ २२ तासांवरून सुमारे १६ तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. आधुनिक सुविधा आणि वेगामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते बंगळुरूतील केएसआर सिटी (KSR City) दरम्यान दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार

सध्या मुंबई आणि बंगळुरू दरम्यान उद्यान एक्सप्रेस धावत असून १,१३४ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे २२ तास लागतात. या ट्रेनचा सरासरी वेग सुमारे ५२ किमी प्रति तास आहे. मात्र वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवास सुमारे १६ तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

Scroll to load tweet…

वेळापत्रक आणि थांबे अद्याप जाहीर नाहीत

या नवीन ट्रेनचे अधिकृत वेळापत्रक आणि थांब्यांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र प्रवासी संघटनांनी ही ट्रेन सायंकाळी ५ वाजता मुंबईहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता बंगळुरूला पोहोचावी, अशी मागणी केली आहे.

कोकण मार्गाला डावलून बंगळुरूला प्राधान्य

सुरुवातीला ही स्लीपर वंदे भारत ट्रेन कोकण मार्गावर सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र मुंबई-बंगळुरू मार्गावर प्रीमियम ट्रेन (दुरंतो, राजधानी) नसल्याने या मार्गाला प्राधान्य देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावर वेगवान ट्रेनची मागणी होती.

आधुनिक सुविधा आणि सुरक्षितता

वंदे भारत स्लीपर ट्रेन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी या ट्रेनमध्ये आधुनिक कोच, वर्ल्ड क्लास टॉयलेट्स आणि बाथ सुविधाही असतील. तसेच सुरक्षेसाठी ‘कवच’ ही टक्कर विरोधी प्रणाली बसवण्यात आली आहे.

प्रवाशांसाठी मोठा दिलासा

वेग, आराम आणि आधुनिक सुविधा यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. विशेषतः मुंबई आणि बंगळुरू दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.