राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात एक मोठी आणि अनपेक्षित बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

महाराष्ट्राच्या राज्यपालांना मिळाली मोठी जबाबदारी

उपराष्ट्रपतीपदासाठी अनेक नावं चर्चेत असताना भाजपने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. या घोषणेनंतर भाजपच्या संसदीय बोर्डाच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असे नड्डा यांनी सांगितले.

Scroll to load tweet…

निवडणूक बिनविरोध होणार का?

जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी NDA ने सर्व राजकीय पक्ष, विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांशी संपर्क साधला आहे. "आम्ही विरोधी पक्षांना उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी आणि आमच्या उमेदवाराला पाठिंबा मिळावा, अशी विनंती केली आहे. त्यांचा उमेदवार पाहून ते पाठिंब्याबद्दल निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले आहे. आमच्या मित्रपक्षांशीही सविस्तर चर्चा झाली असून, त्यानंतर आम्ही हा निर्णय जाहीर करत आहोत," असे नड्डा यांनी स्पष्ट केले.

या अनपेक्षित घोषणेमुळे देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एक नवा अध्याय सुरू झाला आहे. आता विरोधी पक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.